पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समिधा : इस्माईलसाहेब मुल्ला स्मृतिग्रंथ

  महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराचे समर्पित मोहळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उठवले अन् खेड्यापाड्यात शाळा-कॉलेजीस् सुरू होऊन बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली. या प्रचार व प्रसार कार्यात कर्मवीरांना ज्या समर्पित शिक्षणप्रेमींची साथ लाभली त्यात (पै.) इस्माईलसाहेब मुल्ला यांचा क्रम वरचा. स्वतः हलाखीचे जीवन जगून माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा ब-याचदा पूर्वीच्या जीवनाकडे पाठ फिरविण्याचीच त्याची वृत्ती असते. इस्माईलसाहेब मात्र याला अपवाद होते. आईला सुख देता न आल्याचे शल्य जन्मभर जागवत राहून सुखासीन जीवनाकडे पाठ फिरविणा-या या महामानवाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा हा स्मृतिगंध आजच्या विनाअनुदान शिक्षणप्रसार चळवळीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे.
   शिक्षण हा एक महायज्ञ आहे. या यज्ञात अनेक समिधा समर्पित होतात तेव्हा कुठे वन्ही चेतवला जातो. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आदींनी वंचितांसाठी विद्येचे विहार खुले केले. इस्माईलसाहेब याच पठडीतले. घरात पत्नीच्या अकाली निधनाने पोरकी झालेली पोटची पोरे सांभाळण्याबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून धुरा सांभाळली. या विधिविशारद शिक्षणप्रेमीच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेण्याचा संपादकांनी केलेला प्रयत्न अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.
  या स्मृतिग्रंथात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते शाळेच्या शिपायापर्यंत सर्वांनी भावसुमनं समर्पित केली आहेत. त्यातून एक चांगला स्मृतिग्रंथ साकार झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील आजच्या परिस्थितीत तो मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. कर्मवीरांनी लोकवर्गणीतून शिक्षण विकास केला. सध्या लोकवर्गणीतून व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याचा नवा धंदा बरकतीत आहे.


वेचलेली फुले/२७