पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सौदामिनी : महाराणी ताराबाईंवरील चरित्र कादंबरी

  'कस्तुरी', 'मत्स्यगंधा', 'लावण्यमयी' कादंब-यांच्यामुळे मराठी वाचकांना परिचित झालेल्या प्रा. शरद वराडकर यांची ‘सौदामिनी' ही पहिली ऐतिहासिक कादंबरी. स्वातंत्र्यरागिणी ताराबाईच्या जीवनावर आधारित ही कादंबरी ऐतिहासिक सत्याशी इमान राखून, त्या सत्याशी सुसंगत वाटेल इतकीच कल्पितांची मदत घेऊन लिहिली गेली आहे. सन १६७५ ते १७६१ या कालखंडाचे प्रत्ययकारी चित्र रेखाटण्याचा प्रा. वराडकरांनी केलेला प्रयत्न अभिनंदनीय होय.
  महाराणी ताराराणीच्या जन्म व मृत्यूपर्यंतच्या नऊ दशकांच्या दीर्घकालावधीच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या या कादंबरीत लेखकाने केवळ ऐतिहासिक घटनांचा तत्कालीन युगबोधच देण्याचा प्रयत्न केला नसून त्या त्या घटनांच्या अनुषंगाने प्रकटणारी राजकीय मुत्सद्देगिरी, व्यक्ती स्वभाव विशेष इ. चे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. त्यामुळे अखंड मराठी साम्राज्य भगव्या झेंड्याखाली नांदावे म्हणून जीवनभर झगडणारी महाराणी ताराराणी महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी, शूर अशी राणी म्हणून आपणासमोर उभी रहाते. चाळीस वर्षाचा काळ कैदेत काढून साम्राज्य रक्षणार्थ तिची होणारी तळमळ पाहिली की, वाचक क्षणभर सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास तत्त्वे. तो इतिहासाभास असतो, हे जर समजून घेतले तर ही कादंबरी तत्कालीन समाज जीवनाचे जे चित्र घेऊन येते ते सतराव्या, अठराव्या शतकास शोभणारे असेच आहे, हे मान्य करावे लागेल. मोगलांच्या निकट संपर्काने बदललेल्या मराठी भाषेच्या रूपाचे यथार्थ प्रतिबिंब आपणास इथे पहायला मिळते. जागोजागी मोगलांच्या तोंडून प्रकटणारी वाक्ये लेखकाचे हिन्दी भाषेचे जुजबी ज्ञान प्रकट करून जातात, हे मात्र आपणास नाकारता येणार नाही. मोगल हिंदी ही उर्दूप्रचुर होती याचे लेखकास विस्मरण झाल्यासारखे वाटते. युगबोध होण्यासाठी तत्कालीन भाषा नेहमीच उपकारक असते. हे लक्षात घेतले असते तर ही कादंबरी अधिक परिणामकारक झाली असती.
 अलीकडच्या मराठी वाङ्मयात व्यक्तिप्रधान ऐतिहासिक कादंब-यांची


वेचलेली फुले/२२