पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजकीय पक्ष कार्य

 काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष अशी अनेक राजकीय पक्ष स्थित्यंतरे एस.एम. जोशी यांनी सन १९२९ ते १९८९ पर्यंतच्या सात दशकांच्या राजकीय प्रवासात पाहिली. कार्यकर्ता, स्वयंसेवक, पदाधिकारी असा सतत चढता आलेख त्यांनी अनुभवला. राजकीय पक्ष कार्य केवळ लोक संघटनेचे असत नाही. प्रश्न, समस्याकेंद्री चळवळी, निवडणुका, संसदीय कार्य, पक्षीय संघर्ष यांचा लपंडाव, खोखो, हतूतू म्हणजे राजकारण, विचार व व्यवहार यांचा मेळ घालत केलेली स्पर्धा म्हणजे राजकारण. पण एस.एम.नी तत्त्वाधिष्ठित राजकारण केले. त्यांचे भलेबुरे परिणामही सोसले. हारही मिळाले व प्रहारही! पण एस.एम.नी शेवटपर्यंत राजकारण सोडले नाही. राजकारण सोडणे म्हणजे त्यांच्या लेखी जगण्यावरची श्रद्धा सोडणे होते. प्रत्येक राजकीय वळणावर त्यांना स्वपक्षीय व विरोधकांच्या चेकमेटला तोंड द्यावे लागले. कधी फसगत झाली, कधी अनपेक्षित यश, विजय पदरी आला. आयुष्यभराच्या राजकीय लढतीनंतर उत्तरायणामध्ये एस. एम. जोशी यांना सत्ताधारी होण्याचं यश लाभले. पण राजकीय पटावर ते महात्मा गांधींप्रमाणे पदांपासून दूर राहिले. तत्त्व आणि मूल्य, प्रामाणिकपणा, पारदर्शिता, सत्यनिष्ठा या गोष्टी कितीही आदर्श असल्या, तरी पक्षीय राजकारणात त्यांचे स्थान रकान्यात असते. हे माहीत असून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिबद्धता हेच एस. एम. जोशी यांच्या राजकीय जीवनाचं वजन होतं.

 'मी एस. एम.' आत्मचरित्रात एक हृद्य प्रकरण आहे. त्याचे शीर्षकही मनोज्ञ आहे. 'मी' चा मागोवा' यात एस. एम. जोशी यांनी आपल्या जीवनाचे सिंहावलोकन केलं आहे. त्यानुसार एस.एम. मान्य करतात की, 'माणसाच्या अंगी कितीही गुण असले, तरी त्याला यश येईल याची खात्री देता येत नाही. त्यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते. यात त्यांनी आपल्याबाबत असलेल्या प्रवादांची चर्चा केली आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र अधिक प्रांजळ झाले आहे. एस.एम.नी आपल्यावर होणा-या सात्त्विकतेच्या आरोपाची चर्चा केली आहे. ते स्वत:ला ‘सात्विक' न मानता ‘तामसी' मानतात. त्यांचा त्रागा खरं तर अन्यायाविरुद्धची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. त्यांना गैर खपत नसते ते मूल्यनिष्ठेमुळे. त्यांना दांभिकपणा अजिबात सहन होत नाही. मतभेद म्हणजे ते ‘मनभेद' यावर त्यांचा विश्वास नाही.

 आपल्या जीवनात ते पत्नीचे अनन्यसाधारण महत्त्व कबूल करतात. त्यांची लोकशाही, शांतता, अहिंसा इ. वर शेवटपर्यंत श्रद्धा होती. सन १९७२

वेचलेली फुले/१९४