पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

एकलकोंडा : एकटेपणा चितारणारी कादंबरी

आजच्या मूल्य हरवून बसलेल्या समाजात मनुष्य निराश्रित, पतनोन्मुख झाल्याची जाणीव आपणास क्षणोक्षणी येते. जीवन उभारण्याची उभारी घेऊन उठलेल्या असहाय्य व्यक्तीस तर या बदलत्या समाजाचे बरे-वाईट अनुभव पदोपदी येतात. परिणामी त्या व्यक्तीस कमालीची उदासीनता, परकेपणा, एकाकीपणा निर्माण होतो. या यथार्थ अनुभूतीचा प्रत्यय देणारी आनंद यादव यांची ‘एकलकोंडा' कादंबरी पानागणिक वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य घेऊन येते. ग्रामीण परिसर, ग्रामीण पात्रे व ग्रामीण भाषा (पण ग्राम्य नव्हे) या लयीतून फुललेली ही कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याच्या इतिहासात मोलाची भर घालणारी ठरावी. पानकवली गावच्या एका हातावरचे पोट असणा-या। कुटुंबातील ‘धोंडिराम'. या धोंड्याचा राम कसा होतो याची ही कथा. लहानपणीच आई-वडील वारल्यामुळे काकांच्या आश्रयाला आलेला राम स्वत:च्याच घरी परका ठरतो. पुढे एका वकिलांचा घरगडी बनतो. वकील नोकरीसाठी परगावी निघून गेल्यावर नशीब काढायला तो कोल्हापूर, पुणे, मुंबई इ. ठिकाणी जातो. हमाल किंवा कोळशाच्या वखारीत गडी म्हणून आईच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे काम करतो. शिकत राहतो. साने गुरुजींचे साहित्य वाचून झपाटला जातो. स्वाभिमानाने उभे राहण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही हताश झालेला राम पुनश्च पानकवलीत येऊन सुखावतो. अशी एक सामान्य कथाबीज घेऊन साकारलेली ही कादंबरी निखळ आत्मकथनाने वाचकांचे हृदय गलबलून टाकते. या कादंबरीचे सारे श्रेष्ठत्व अनुभवांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीत आहे. कादंबरीत कुठेही उपमा, अनुप्रास याचा सोस नसतानाही ही कथा केवळ क्रमगत घटनांच्या जोरावर उभी राहते. महाराष्ट्र टाइम्सकारांनी ‘यादव पत्रिका' अग्रलेखात ग्रामीण साहित्यातील आनंद यादवांच्या देण्याबद्दल जे मतप्रदर्शन केले होते त्याचे उत्तर म्हणूनही या कादंबरीकडे पाहायला हरकत नाही. अण्णाभाऊ साठ्यांनी मराठी साहित्यात ग्रामीण कथानकांची परंपरा निर्माण केली. या परंपरेचा वारसा घेऊन पुढे येणा-या या


वेचलेली फुले/१७