पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंबर वन' : खेळाडूंच्या अंतरकथा


 मराठी कथा साहित्यात आजवर जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे. परंतु क्रीडा नि क्रीडांगण त्यात अपवादानेच प्रतिबिंबित झालेले दिसते. मराठी कथा साहित्यातील ही पोकळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी नंबर वन' या आपल्या कथासंग्रहाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवामुळे अत्यंत यशस्वी झाला आहे. मराठी चोखंदळ वाचकांना लक्ष्मीकांत देशमुख हे नाव परिचित आहे. अफगाणच्या वर्तमान तालिबानी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' कादंबरी, साधना साप्ताहिकात सुरू असलेले प्रशासननामा' हे वैचारिक सदर, ललित लेख याशिवाय त्यांच्या नावावर ‘कथांजली', 'अंतरीच्या गूढ गर्भी', 'पाणी!पाणी!', ‘अग्निपथ' सारखे कथासंग्रह जमा आहेत. त्यांचे लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. आयुक्त, विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक, जिल्हाधिकारी अशी पदे भूषवत असतात ते समाजाच्या सर्व थरातील प्रश्न व लोक समजून घेतात. या प्रक्रियेत अनेक कथाबीजे त्यांच्या हाती लागतात. त्यांच्या मनोज्ञ कथा होतात. त्यामुळे कल्पनेपेक्षा वास्तवाधारित लेखन हा त्यांचा पिंड होतो. त्यातून जन्मलेलं साहित्य नवे विश्व घेऊन उभे ठाकतं. ते वाचकांना नवे विश्व दाखवतं.

 नंबर वन' नावाप्रमाणेच खेळाडूमधील माणूसपणाचा शोध घेणारा, त्यातील संघर्ष व भावनांचे द्वंद्व चित्रित करणारा नंबर वन (पहिला नि उत्कृष्ट अशा अर्थांनी) कथासंग्रह आहे. हा 'थीम बेस्डू असा कथासंग्रह असल्याने प्रयोग म्हणूनही मराठी कथा प्रांगणात त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘भारत देश ‘क्रीडा महासत्ता' का होत नाही हा लेखकाला पडलेला प्रश्न आपले सामाजिक शल्य आहे. या शल्यपूर्तीच्या ध्यासाची निर्मिती म्हणजे नंबर वन' मधील कथा ‘पढेंगे लिखेंगे तो राजा बनेंगे! खेलेंगे, कुदेंगे तो खाक होंगे।।' ही भारतीय मानसिकता दूर करायची तर खेळ हा धर्म आहे, ती वृत्ती आहे. तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो काही रिकामपणाचा उद्योग नाही असा संस्कार रुजवणे आवश्यक असल्याचे लेखकाचं मत विचारणीयच नव्हे तर अनुकरणीय

वेचलेली फुले १५६