पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘आकाशवेल : साहित्य आणि वक्तृत्वाचा संगम


 ‘आकाशवेल' हा प्राचार्य डी. जी. पी. माळी यांच्या आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेल्या मुख्यतः भाषणांचा संग्रह आहे. शिवाय त्यात मुलाखतही आहे. पण ती अपवाद! चिंतन कार्यक्रमात प्रक्षेपित विचारांचा अंतर्भाव भाषणातच होईल. ही भाषणे विषयाच्या अंगांनी वैविध्यपूर्ण आहेत. पण मुख्यतः त्यांचा आधार मराठी साहित्यच आहे. 'रामदासांची काव्यशक्ती', ‘ज्ञानेश्वरी', 'पडघवली', 'लग्नाची बेडी', 'मराठीतील आईविषयक कविता अशी भाषण शीर्षके या दृष्टीने पुरेशी बोलकी आहेत.

 ‘आकाशवेल'चे आपले असे एक वेगळे शब्दाकाश आहे. मला काय त्याचे? चांगला माणूस कोण? सारखी चिंतने वाचकांस अंतर्मुख करतात, आजचे समाजजीवन दिवसेंदिवस बेफिकीर होत आहे. प्रत्येक जण आपल्या पावलाखालच्या जगापलीकडे पाहीनासा झालाय. बाहेरचे सामाजिक अरिष्ट जोवर उंबरा ओलांडून आपल्या घरात येत नाही, तोवर अस्वस्थ व्हायचे नाही, क्रियाशील व्हायचे नाही, अशी एक मध्यमवर्गीय मानसिकता प्रलयासारखी पसरते आहे. त्सुनामी लाटेची वाट पाहण्यात काय हाशील? समाजजीवनातील तटस्थ वृत्तीवर नेमके बोट ठेवणारी चिंतने नव्या समाजाच्या विकृत चाललेला चेहरा आपणास दाखवून अस्वस्थ करतात.

 कारागृहात जन्मलेल्या साहित्यकृती हे भाषण असेच वेगळ्या वाणाचे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकनायक जयप्रकाश, बालचिंतक साने गुरुजी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आचार्य विनोबा भावे हे प्रभृती देशप्रेमी तुरुंगात गेले. त्या वेळी तुरुंग आलिशान विश्रामगृहाचा नव्हता. अभाव आणि नियंत्रणाच्या काचातून या मंडळींनी आपला वाचन, विचार, लेखनाचा व्यासंग जपला. भारतातील अनेक श्रेष्ठ कृती या तुरुंगास जन्मल्या. ही ब्रिटिशांनी भारतास दिलेली देणगीच म्हणावी लागेल. अन्यथा या देशप्रेमींना लेखनाची उसंत मिळते कठीण. अशा सर्व साहित्यकृतींचा परिचय करून देणारे ‘आकाशवेल' मधील प्राचार्य माळींचे भाषण म्हणजे स्वातंत्र्यप्रेमी राजकारण्याच्या साहित्यिक व्यासंगाची आत्मीयतेने करून दिलेली ओळखच ती माहितीच्या अंगांनी दिली

वेचलेली फुले/१२०