पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकशाहीला कम्युनिस्टांकडून धोका नसून धार्मिक कर्मकांडातून पुढे येऊ लागलेल्या वेडगळ कल्पनांच्या पुनरुत्थानाचा धोका संभवतो. म्हणून त्यांनी त्या वेळी सोमनाथच्या नूतन मंदिराच्या उद्घाटनाला जाणाच्या राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहून सांगितले होते की, 'निधर्मी राष्ट्राच्या प्रमुखाने धार्मिक बाबींमध्ये अशा प्रकारे सामील होऊ नये' दुर्दैवाने नेहरूंनंतर आलेल्या नेत्यांचा कणा तेवढा ताठ नव्हता आणि ते खंबीरही नव्हते. अशी मर्मग्राही चिकित्सा करणारे हे पुस्तक इतिहासाच्या संदर्भानी दुथडी भरून वाहात राहते. म्हणून हा लेखसंग्रह विवेकी वाचकांना अस्वस्थ करत राहतो. श्री. चंद्रशेखर मुरगूडकर यांनी प्रवाही भाषेत अनुवाद करून यास मूळ ग्रंथाचेच वैभव प्राप्त करून दिलेय. हा केवळ अनुवाद न राहता ते मूळ ग्रंथांचे पुनसर्जनच झालेय. हिंदी, पंजाबी, भाषेच्या अनुवादासंबंधी अपूर्ण आकलनांचे काही अपवाद वगळता हा अनुवाद त्यांच्या पूर्व अनुवादांपेक्षा खचितच सरस झालाय.


• भारताचा अंत (लेखसंग्रह)

 लेखक - खुशवंत सिंग
 अनुवादक : चंद्रशेखर मुरगूडकर
 प्रकाशन - चिनार प्रकाशन, धनकवडी, पुणे ४३

 पृष्ठे ८०  किंमत - ७५ रुपये

♦♦

वेचलेली फुले/१११