पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाषिकांना खांडेकर आपल्याच भाषेतील लेखक वाटतात. मराठी भाषा व साहित्यास ज्ञानपीठ पारितोषिक पहिल्यांदा मिळवून देऊन खांडेकरांनी आपल्या साहित्याचे राष्ट्रीयत्व सिद्ध केले. अशा खांडेकरांचे समग्र, सुबोध जीवनचरित्र ही मराठी साहित्यातील पोकळी होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न ही काळाची गरज होती. हे चरित्र म्हणजे खांडेकर व्यक्ती आणि वाङ्मयाचा अन्वयार्थ होय.
पूर्वज
 बळवंतराव खांडेकर हे खांडेकर कुटुंबाचे ज्ञात पूर्वज होत. त्यांचे एक भाऊही होते. विष्णुशास्त्री त्यांचे नाव. हे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे. तिथल्या भटवाडीत आजही त्या कुटुंबाच्या रहिवासाच्या पाऊलखुणा स्थावराच्या रूपात साक्ष देतात. पैकी बळवंतराव खांडेकर हे वकिली करण्यासाठी म्हणून कर्नाटकातील हुबळी येथे गेले व स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. मुलाचे नाव आत्माराम. तो पंधरासोळा वर्षांचा असताना कॉलऱ्याने त्याच्या वडिलांचे म्हणजे बळवंतरावांचे निधन झाले. व्यवसायाशिवाय तिथे या कुटुंबाची मिळकत नसल्याने आत्माराम आपल्यासह दोन अनाथ बहिणींना घेऊन पैतृक गावी सावंतवाडीस आला. तिथे परतल्यावर आपल्या काकांशी म्हणजे विष्णुशास्त्रींशी संपत्तीच्या हक्कावरून त्याचे मतभेद झाले. तो भरल्या पानावरून उठला नि तडक सांगलीस आला. त्या काळी सांगली, कोल्हापूर या तत्कालीन घाटमाथ्यावर परुळेकर, बावडेकरांसारखी कुटुंबे कोकणातून येऊन स्थिरावली होती. कोकणातून येणाऱ्यांचे ते आधार बनत. इंग्रजी चांगले असणाऱ्यांना लगेच नोकऱ्या मिळत. कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी इत्यादी संस्थानिकांच्या राजधानीत त्या वेळी पोलिटिकल एजंटच्या कचेऱ्या असत. त्यांना सनदी कामासाठी मुन्सफ लागायचे. आत्माराम सांगलीस येऊन ओळखीच्या आधारावर शिकला, वकील झाला व मुन्सफ बनला.

 तो काळ १८५७ च्या बंडानंतरचा होता. सांगली संस्थानात तात्यासाहेब पटवर्धनांचे राज्य होते. बाबाकाका माईणकर हे दरबारी पुराणिक होते. या संस्थानाचे गणपती देवस्थान होते. त्याची पूजा-अर्चा माईणकरांकडे होती. ते देवळालगतच राहत. त्यांची सर्वांत धाकटी कन्या होती सुंदरी. ती उपवर होताच संस्थानातील आत्मारामपंत या उमद्या मुन्सफाचे स्थळ योग्य वाटून त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर वधूचे नाव रमाबाई ठेवले. आत्मारामपंत व रमाबाई यांचे कुटुंब सुखावले. त्यांना तीन मुले झाली. बळवंत, गणेश आणि शंकर. पैकी गणेश आत्माराम खांडेकर वयाच्या अठराव्या वर्षी

वि. स. खांडेकर चरित्र/८