पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण पहिले
वि.स.खांडेकर जीवनपट : तिमिरातुनी तेजाकडे

 भारतीय साहित्यावर मराठी भाषेची नादमुद्रा उठविणारे पहिले मराठी साहित्यिक म्हणून वि.स.खांडेकर खांडेकरांना ओळखलं जातं. विसाव्या शतकात स्वातंत्र्य, समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या पंचशील तत्त्वांना बांधील राहून त्यांनी लेखन केले.धर्मांधता,जातिभेद, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा, दारिद्रय, अज्ञान इत्यादी त्या शतकातील प्रश्नांना प्रमाण मानून त्यांनी त्यांची उकल साहित्याद्वारे प्रभावीपणे केली. यासाठी वि.स.खांडेकर हे समाजशील साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कथा, कादंबरी,रूपककथा,लघुनिबंध, नाटक, काव्य,पत्र, समीक्षा, अनुवाद,संपादन,व्यक्तिचित्रण, पटकथा लेखन इत्यादी साहित्यप्रकारांत केवळ भरच घातली, असे नव्हे. त्यांनी रूपककथा,लघुनिबंध या साहित्यप्रकारांचे जनकत्व पेलले. भाषा व शैलीच्या प्रांतांत अलंकाराचे सौंदर्य व शैलीचे सुभाषित मार्दव त्यांनी विकसित केले. या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या समग्र साहित्यास सामाजिक चिंतनाचे रूप लाभले.पिढ्या घडविण्याचे कार्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत वि.स.खांडेकरांचा समावेश होतो, तो या योगदानामुळे. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण,महाभारत,पंचतंत्र,पुराण इत्यादींमधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही, तर त्याचा समकालीन परिस्थितीशी अन्वय लावून त्याचा नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय. यामुळे वि. स. खांडेकरांचे साहित्य केवळ मराठी व महाराष्ट्रीय न राहता ते भारतीय आणि वैश्विक बनले. या त्यांच्या साहित्याच्या अभिजात कसोटी व कौशल्यामुळेच त्यांच्या साहित्य व चित्रपटांचे अनुवाद हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये झाले. गुजराती, तमिळ, मल्याळम् या भाषांत तर त्यांचे समग्र साहित्य अनुवादित झाल्याने त्या

वि. स. खांडेकर चरित्र/७