पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विवाहानंतर खांडेकरांनी पत्नीचे नाव ‘उषा' ठेवले. ते त्यांच्या संगीत रंकाचे राज्य'च्या नायिकेचे होते. मनाची नायिका प्रत्यक्षात मिळाल्याचीच ती साक्ष होती. विवाह साधेपणी, कर्मकांडास फाटा देऊन करण्यात आला. लग्नातील भोजनाच्या वेळी पंक्तिभेद (जातिभेद) होणार नाही, याचे आश्वासन घेऊन केलेला हा विवाह म्हणजे खांडेकरांच्या आचार-विचारांतील अद्वैत सिद्ध करणारा वस्तुपाठच ठरला. त्यानंतर लग्नविधी आवरल्यावर यथावकाश त्यांनी शिरोड्यास संसार थाटला. तो पाहण्यासाठी (लग्न चुकल्याची चुटपूट दूर करण्याच्या हेतूने) गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मे, १९३० च्या पहिल्या आठवड्यात शिरोड्यास मुद्दाम आले व शिष्यास आशीर्वाद देऊन गेले.
मिठाचा सत्याग्रह
 भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे व दीर्घकालीन (१९३० ते १९३४) जनआंदोलन म्हणून मिठाचा सत्याग्रह ओळखला जातो. मिठावरच्या कराचा भार गरिबातील गरीब भारतीयांवर पडत असे. लहरी पावसामुळे लाखो शेतकरी कर भरू शकत नसत. करबंदी आंदोलनाचा भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याची सुरुवात गुजरातमधील दांडीयात्रेने झाली. ६ एप्रिल, १९३० रोजी दांडी येथे कायदा भंग करून मीठ तयार करण्यात आले. त्यात महात्मा गांधींजींना अटक करण्यात येऊन पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्याच दिवसापासून महाराष्ट्रातही मिठाचा सत्याग्रह विलेपार्ले (मुंबई) येथे सुरू करण्यात आला. कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रात संघटित रीतीने व शिस्तीने व्हावे म्हणून महाराष्ट्र कायदेभंग मंडळ स्थापन करण्यात आले. त्या मंडळातर्फे शिरोडे येथे १२ एप्रिल ते १५ एप्रिल, १९३० या कालावधीत राज्यस्तरीय मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याचे नेतृत्व मामासाहेब देवगिरीकर व धर्मानंद कोसंबी यांच्याकडे होते. शिरोडे गाव गोवा व महाराष्ट्राची सरहद्द असल्याने व तिथे मिठागरे असल्याने शिरोड्याची निवड करण्यात आली. गोव्यात तेरेखोल येथे पोर्तुगीजांविरुद्ध, तर महाराष्ट्रात शिरोडे येथे ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. ५०० जणांनी त्यात भाग घेतला. ३०० जणांना अटक करण्यात आली. उरलेले जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 वि. स. खांडेकर या सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाले होते. त्यांचे सहकारी अप्पा नाबर यांचे मिठागर सत्याग्रहासाठी निवडण्यात आले होते. त्यांचे दुसरे एक सहकारी व ‘वैनतेय'चे संपादक मेघश्याम शिरोडकर या सत्याग्रहाम सामील होते. वि. स. खांडेकरही यात सामील होणार होते;

वि. स. खांडेकर चरित्र/२४