पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा तत्कालीन अनेक प्रश्नांवर खांडेकरांनी अक्षरशः शेकडो पाने भरतील इतका मजकूर लिहिला. कधी स्वतःच्या नावाने, कधी अनामिक, तर कधी विहंगम, आदर्श, कुमार, इत्यादी टोपणनावांनी, याशिवाय त्यांनी 'वैनतेय'मध्ये कथा, लघुनिबंध, लेख, विनोदी साहित्य, नाट्यछटा, कविता असं अनेकांगी साहित्यलेखन केलं. वि. स. खांडेकरांचा पहिला लघुनिबंध ‘वैनतेय'च्या २२ फेब्रुवारी, १९२७ च्या अंकात ‘रानफुले' सदरात ‘निकाल द्या' (How's that) शीर्षकाने प्रकाशित झाला होता. लघुनिबंधकार म्हणून खांडेकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची गंगोत्री वैनतेय' होती. पुढे पाच दशके खांडेकर लघुनिबंध लिहीत राहिले. या काळात त्यांनी सुमारे पावणे दोनशे लघुनिबंध लिहिले.
 वैनतेय साप्ताहिक डेमी आकारात (Tabloid) छापले जायचे. त्या काळी विविध वृत्त, धनुर्धारी, नवयुग याच आकाराची असत. 'वैनतेय'मधील वैविध्यपूर्ण लेखनामुळे साहित्यिक,संपादक,समीक्षक, स्तंभलेखक म्हणून वि.स.खांडेकरांचा लौकिक सर्वदूर पसरला. या संपादन कार्यामुळे वृत्तपत्र हे लोकजागृतीचे व लोकशिक्षणाचे प्रभावी साधन असल्याची खात्री खांडेकरांना झाली. त्यांना शाळेप्रमाणेच वर्तमानपत्र हे सांस्कृतिक साधन वाटू लागले.'वैनतेय'च्या माध्यमातून खांडेकरांनी जातीय सलोखा, प्रबोधन, समाजास पुरोगामी बनविण्याचे कार्य केले. गैर गोष्टींवर प्रहार करण्यात ‘वैनतेय'नं कधी कुचराई केली नाही. सदसदविवेकाचा कौल सार्वजनिक जीवनात निर्माण करण्याचे कार्य यामुळे खांडेकर करू शकले.'वैनतेय'चं ग्राहक क्षेत्र मर्यादित असले तरी त्याचा वाचक, ग्राहक चोखंदळ व चिकित्सक होता. यामुळे बुद्धिवादी व विवेकशील वर्गाशी आपल्या साहित्याद्वारे खांडेकर नाळ जोडू शकले. अंधश्रद्धा निर्मूलन विचारास हातभार लावून खांडेकरांनी समाज पुरोगामी, वैज्ञानिक बनविण्याचा प्रयत्न केला.
प्रथम प्रकाशित पुस्तक

 वि.स.खांडेकरांना लेखनाचा छंद बालपणापासूनच; पण त्यांचे लेखन सन १९१९ पासून विविध नियतकालिकांत प्रकाशित होत राहिले. उद्यान, नवयुग,वैनतेय,ज्योत्स्नासारख्या नियतकालिकांतून ते प्रकाशित होत राहिलं. कथा,कविता, विनोद,परीक्षण,लेख असे त्याचे स्वरूप असायचं; पण पुस्तकरूपी प्रकाशन होण्यास मात्र १९२८ वर्ष उजाडावे लागलं.

वि. स. खांडेकर चरित्र/२०