ठळक मजकूर स्त्रियांनी पुरुषी सहिष्णुतेच्या अंगाने तर पुरुषांनी स्त्रीदाक्षिण्याच्या उदारतेने वाचायला हवा. 'इसरो' हा मेघना ढोकेंनी लिहिलेला लेख त्याची नुसती चित्रं पाहिली तरी भारताने क्षेपणास्त्र सज्जतेत किती दिव्यातून जात प्रगती साधली हे लक्षात येते. रामदेव बाबा नि आचार्य बालकृष्णावरील अपर्णा वेलणकरांनी आणि मंदार भारदे यांनी लिहिलेला 'कहो ना, करा' लेख आपल्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिकवणी म्हणून वाचायला हवा. 'बुमला पास', 'डिजिटल शाळा' लेख वाचकांचे डोळे उघडणारे ठरले आहेत. 'शेतात जेव्हा बीज पिकते' वाचले की शेतकरी आत्महत्येचा सतत कर्जमाफी हा उपाय नसून उपक्रमशील सातत्य हाच त्याचा खरा पर्याय असल्याचे उमजते. त्याचे अनुकरण मात्र महत्त्वाचे. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत इ. दैनिकांचे विविध दिवाळी अंकही अनुभव, गाव, काश्मीर अशा वैविध्यपूर्ण माहिती, मनोरंजनाने सजलेले आहेत.
हे वर्ष 'वसंत' मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ते लक्षात घेऊन दिवाळी अंकात विज्ञान, समीक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण असा फेर धरत दिवाळी अंकाने आपला विषय परीघ रुंद केला आहे. तर एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'ऋतुरंग' वार्षिकाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. या वर्षीचा विषय आहे 'माझ्या मनातलं!' गुलजार, लता मंगेशकर, नितीन गडकरी, संदीप वासलेकर, गिरीश कुबेर, निखिल वागळे प्रभृती मान्यवरांच्या मनातलं वाचताना लक्षात येतं की माणसाचं मन ही अंत न लागणारी अलिबाची गुहा खरी!
'ललित', 'दीपावली', 'हंस', 'उत्तम अनुवाद', 'शब्दमल्हार', 'शब्दशिवार' हे साहित्यिक मेजवानी देणारे दिवाळी अंक होत. मराठी साहित्यातून नागर जीवन ओसरत असल्याची खंत, संगीतातलं 'सफेद झूठ', उत्तमोत्तम भारतीय विविध भाषांतील साहित्यिक कृतींची भाषांतरे असा ऐवज या अंकातून हाती येतो नि "दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा'ची प्रचिती येते. दिवाळीच्या ऐन धामधुमीत सारं जग चकचकीत, झगझगीत, चमचमीत खरेदी करत चंदेरी जीवन व चटोर जीभ सुखद बनवत असताना मी मात्र अधिक सकस वाचायला कुठल्या दिवाळी अंकात काय मिळेल म्हणून अधाशी वाचन प्रेरणेने असोशीने दिवाळी अंकांची खरेदी करण्याचे सुजाण शहाणपण जपत राहिलो. कालच्या तुळशीच्या लग्नापर्यंतच्या दिवसात वरील दिवाळी अंकातील निवडक वाचू शकलो. चिवडा खाताना