पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून अभिजात।

 अमृता प्रीतम यांच्या कविता एकाच वेळी आत्मपर असतात नि परात्मपरही. 'उन्हाचा तुकडा' ही या संग्रहातील पहिली कविता. जत्रेत हरवलेल्या मुलाचीपण असते नि कवयित्रीच्या मनातील भाव कल्लोळाचीपण. 'जत्रेतल्या कोलाहलातही एक शांततेचे जग आहे' या ओळीतून ते स्पष्ट होते. 'मी' शीर्षक कविता तर स्पष्टच आत्मपर, वैयक्तिक नि स्वतःची अशी

 ज्या रात्रीच्या ओठांनी कधी स्वप्नांचे भाल चुंबले
 त्या रात्रीपासून कल्पनेच्या पायात जणू पैंजण रुमझुमते आहे

 या ओळी वाचणाऱ्या प्रत्येक वाचकास आपल्या मनातील घुंगरू ऐकायला येऊ लागते. ही असते अमृता प्रीतमच्या कवितेची ताकद नि परप्रत्ययता.

 या संग्रहात 'आवाज' नावाची कविता आहे. ती बेतली आहे सस्सी नावाच्या पंजाबी लोककथेतील एका नायिकेवर. सस्सी प्रियकरामागे तापलेल्या वाळवंटात पळत राहण्याने तिचे तळवे फोडांनी डबडबतात नि पळण्यानेच फोड वेदनाहीन होऊन जातात. ही असते आंधळ्या प्रेमाची ऊर्जा नि ऊर्मी! प्रेमाच्या खुमारीचं वर्णन म्हणजे ही कविता-

 निद्रेच्या ओठांना जणू स्वप्नांचा सुगंध येतो आहे,
 पहिले किरण जणू रात्रीचे भांगेत सिंदूर भरत आहे.

 'कागद आणि कॅनव्हास' मध्ये 'आद्य' शीर्षक कवितांची एक धारावाहिक रचना आहे. सलग सात कवितांमधून अमृता प्रीतम यांनी 'आद्यरचना', 'आद्यपुस्तक', 'आद्यचित्र', 'आद्यसंगीत', 'आद्यधर्म', 'आद्यकबिला', 'आद्यस्मृती' द्वारे जीवनाची सप्तकोनी रचना चित्रित केली आहे. सप्तस्वर, सप्तरंग म्हणजे जीवन ! ते आकारते 'मी' आणि 'तू'मधून. यातला मी आणि तू केवळ प्रियकर-प्रेयसी नाही तर आत्मा-परमात्मा, स्व-पर, व्यक्ती- समाज, शरीर-मन आहे. अमृता प्रीतमांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांची कविता साध्या शब्दांमधून महान व वैविध्यपूर्ण आशयगर्भ विचार वाचकास देऊन त्यास अंतर्मुख करत राहते. ती वाचून सोडता येत नाही. तुम्ही जितका विचार कराल तितक्या खोलात, जंगलात तुम्हास घेऊन जाऊन चकवा, चांदोबा दाखवत राहते. सदर संग्रहातील 'रचना-प्रक्रिया' नावाची कविता काव्यरचनेबरोबर जीवन प्रक्रियाही समजावत राहते.

 'कागद आणि कॅनव्हास'मधील ७३ कविता वाचत असताना लक्षात

वाचावे असे काही/१०५