पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'गीतांजली' ची भुरळ पडली होती, जशी जर्मन कवी गटेला 'शाकुंतल'ची. यिटसच्या प्रशस्तीमुळेच रवींद्रनाथांना नोबेल मिळाले होते. कोल्हापुरातील रवींद्रप्रेमी दानशूर माधवप्रसाद गोयंका यांनी केलेला 'गीतांजली'चा हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे. शिवाय रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दी वर्षी (१९६१) प्रा. अ. के. भागवत यांनी संपादिलेला व गाजलेला 'टागोर : साहित्य, कला, विचार' ग्रंथ कोल्हापुरातच आकारला होता.

 या त्रिखंडी भाषांतर प्रकल्पामध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांचं रवींद्र आकलन समजून घ्यायचं तर दुसरा खंड 'रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव' वाचायलाच हवा. अन्य दोन भाषांतरे होत तर हा खंड मौलिक चिकित्सा. रवींद्रनाथांची घडण, नातीगोती, व्यक्तिमत्त्व पैलू, पत्रसृष्टी, समकालीनांशी संवाद यातून डॉ. जाधव यांनी जे रवींद्रनाथ उभारले आहेत, ते केवळ श्रद्धेमुळेच शक्य!

 तिसरा खंड 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन' हा संग्राह्य ऐवज. यात रवींद्रनाथांचे बहुविध, बहुपेडी साहित्यिक व्यक्तिमत्त्व निर्माण होते, ते त्यांच्या साहित्य नि विचारातून. रवींद्रनाथांवर गौतम बुद्ध, महात्मा गांधी, राजा राममोहन रॉय याचा प्रभाव लक्षात येतो. गांधी वयाने टागोरांपेक्षा लहान असले, तरी त्यांचे कार्य, कर्तृत्व रवींद्रनाथ जाणून होते. स्वदेश आणि राष्ट्रवाद अलीकडे विकृत रूपात पुढे येतो आहे. अशा पार्श्वभूमीवर याबाबत रवींद्र विचार संबंधितांचे डोळे नक्कीच उघडेल. शिक्षण धंदा बनवणाऱ्या वर्तमान युगात शिक्षण माणूस घडणीचे साधन कसे होऊ शकते, जे ज्यांना समजून घ्यायचे आहे, त्यांना हा खंड मार्गदर्शक ठरतो. साहित्य साधना असते. तो शिळोप्याचा उद्योग नाही, हे पण या खंडातून उमजते. संक्षेप व साक्षेपाने रवींद्रनाथांच्या साहित्य प्रकारांची वानगी हा ग्रंथखंड देतो. त्या अर्थाने भाताची चव सांगणारे हे शित एकदा तरी प्रत्येक सुज्ञाने चाखायला हवे.

 भयशून्य चित्त जेथ, सदैव उन्नत माथा
 मुक्त अशा स्वर्गातच होवो, मम जागृत देश आता।

 आजही या ओळी वाचताना गलबलायला होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात रचलेल्या या ओळी शंभर वर्षे उलटली तरी जशाच्या तशा लागू कशा होतात? त्याचं उत्तर एकच, 'जे न देखे रवि, सो देखे कवि'.

वाचावे असे काही/१०३