पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभारता येतातच. ही प्रक्रिया शिवसेनेपुरती मर्यादित नाही. तिची अनेक रूपे असू शकतात. याला उत्तर आपण कसे शोधणार, हा प्रश्न आहे.

परंपरावादालाच बळकटी

याचे उत्तर शिवसेनेच्या मागणीला उचलून धरून देता येत नसते. कारण हा मार्ग क्रमाने भारताच्या विभाजनाकडे नेणारा, सांस्कृतिक अहंतांच्या आवरणाखाली वरिष्ठ वर्गाचे राजकीय, आर्थिक हितसंबंध सांभाळणारा व लोकशाहीच्या नाशाकडे जाणारा असा असतो. शिवसेनेने तमीळ, मल्याळी, तेलगू, कानडी-विरुद्ध मराठी इतकीच भूमिका घेतलेली नसते. त्याने मुसलमान विरुद्ध हिंदू ही भूमिका घेऊन पुढे गांधी विरुद्ध शिवाजी असाही उद्योग केलेला असतो! अशा वेळी शिवसेनेला उचलून धरण्यात अर्थ नसतो. भावनात्मक सांस्कृतिक लढयांना पाठिंबे देऊन आपण फक्त समाजातील परंपरावाद बळकट करू शकतो, कोणतेही पुरोगामी राजकारण पुढे नेऊ शकत नाही.

लढे आणि पुस्तकी तत्त्वज्ञान

मग या लढयांचे काय करायचे ? त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे काय ? कारण असे दुर्लक्षही परवडत नसते. मार्क्सवादाची गरज या ठिकाणी असते. सांस्कृतिक लढयांच्या मागे आर्थिक हितसंबंध असतात. या हितसंबंधांचा नीट अभ्यास करून या लढयांचे उत्तर द्यायचे असते. मुंबईत मराठी माणसांना घर, नोकरी, उद्योग, मजुरी याबाबतीत संरक्षण देऊन शिवसेनेच्या लढ्याला उत्तर शोधावे लागते. लढे केवळ पुस्तकी तत्त्वज्ञानावर उभारले जात नाहीत. केवळ पुस्तकी पद्धतीने त्याचे उत्तरही देता येत नाही. कोणताही लढा सुरू झाला की पुढच्या दहा वर्षांवर त्याचे होणारे परिणाम लक्षात घ्यावे लागतात. यामुळे फक्त जातीय तणावच वाढणार आहे की काही गरिबांचे प्रश्नही सुटणार आहेत, या लढयामुळे आपण जातिभेद ढिला करणार आहोत की बळकट करणार आहोत, समाजाची एकात्मता वाढणार आहे की फुटीरपणा वाढणार

३८।