पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि यशस्वीरीत्या क्रांती कशी घडवून आणली अगर माओ-त्से-तुंग यांनी चीनमध्ये क्रांती कशी घडवून आणली, हा अगदीच वेगळा प्रश्न आहे. एक तर लेनिन आणि माओ यांनी संघटना उभारण्यासाठी कधी पुस्तकी सिद्धान्तांचा आधार घेतला नाही. प्रत्यक्ष ध्यावहारिक राजकारण हाताळण्याची आणि संघटन उभारण्याची त्यांची क्षमता अगदी वेगळ्या पातळीवरची होती आणि दुसरे म्हणजे हे दोन्ही नेते अत्यंत प्रतिगामी व अत्याचारी अशा उजव्या राजवटीच्या विरुद्ध लढत होते. रशिया आणि चीनची कहाणी अगदी निराळी आहे. आपला संबंध भारताशी येतो. स्वातंत्र्योत्तर भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी राजवट अस्तित्वात आणली ती मधून मधून डावी-उजवीकडे झुकणारी, पण सामान्यपणे उदारमतवादी, मध्यममार्गी अशी राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वतंत्र भारत सरकारच्याविरुद्ध लष्करी उठाव करज्याचा एक भव्य प्रयत्न करून पाहिला. या प्रयत्नांना भव्य यासाठी म्हणायचे की एकीकडून रशिया आणि दुसरीकडून चीन यांचा पाठिंबा या उठावाला होता आणि कम्युनिस्टांनी आपले शक्तिसर्वस्व पणाला लावलेले होते. हैद्राबाद संस्थानातील तेलंगण विभाग सोडल्यास या प्रयत्नाला फारसे यश कुठे येऊ शकले नाही. भारत स्वतंत्र होत असताना हिंदू-मुसलमानांच्या झालेल्या प्रचंड दंगली यामुळे सबंध राज्ययंत्रणा खिळखिळी झालेली, महात्मा गांधींचा नुकताच वध झालेला, अजून हैद्राबाद संस्थान शिल्लक असलेले, काँग्रेसची राज्यरचना अजून पुरेशी बळकट न झालेली अशा परिस्थितीतसुद्धा या उठावाला फारसे यश आले नाही ! शेवटी लोकशाहीच्या चौकटीत बसण्याचा निर्णय कम्युनिस्टांना घ्यावा लागला. वर कम्युनिस्ट पक्षातील ज्या दोन गटांचा उल्लेख केलेला आहे ते त्या वेळी एकत्रच होते. या सर्वांनीच संसदीय लोकशाहीच्या चौकटीत बसायचे ठरवले, हे ठरवण्यालासुद्धा त्यांना लेनिनचा आधार होताच!
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेलंगणामध्ये कम्युनिस्टांना फार मोठे यश आले. बंगालमध्ये आणि केरळमध्ये त्यांना थोडेफार यश आले.

१८