पान:वनस्पतिविचार.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१ लें ].     सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा.     
-----

,

 एकाच जमिनींत निरनिराळ्या बीजापासून वेगवेगळे अंकुर फुटतात. जमिनीतील घटकद्रव्ये सारखी असली, किंवा बाह्यपरिस्थिति सारखी केली, अथवा सर्वांची निगा सारखी घेतली, तरी सुद्धा बीजांतील सजीवतत्त्वे आपल्या पूर्व जातींवर जातात, हे लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. निर्जीव वस्तूपासून सजीववस्तु कधी उत्पन्न होत नाहीं. दगडापासून अथवा मातीपासून वनस्पति अगर प्राणी कधी उत्पन्न झाले नाहीत. मात्र सजीव वस्तु, निर्जीववस्तू आपल्या शरिरात घेऊन त्यावर निरनिराळी रासायनिक कार्ये करून त्यांस आपले प्रमाणे एकजीवित्व आणू शकते. वनस्पति जमिनीतील निर्जीव क्षार शोधून त्यापासून स्वशरीर वर्धन करीत असते.

 प्रथम सजीववस्तु कशी उत्पन्न झाली ह्याविषयी मतभेद आढळतो. कांहीच्यामते एकंदर काल असा आला की, ज्यामध्ये माफक उष्णता, माफक शीत व माफक इतर द्रव्ये मिळून त्यांपासून सजीववस्तु निर्माण झाली, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्जीववस्तूपासून सजीववस्तु उत्पन्न झाली. ते म्हणतातः-त्या कालांत उत्पन्न झालेल्या सजीववस्तूंपासून पुढे क्रमाक्रमाने नवीन सजीववस्तू तयार होऊन परिस्थित्यनुरूप विचित्र सजीव सृष्टि बनत गेली. विशेषेकरून नास्तिकवादी ह्या मताचा अनुवाद करितात. जरी पहिली सजीववस्तु निर्जीववस्तुपासून बनली, तथापि हा व्यवहार पुढे तसाच सारखा राहिला आहे असे मात्र म्हणता येणार नाहीं. ' सजीववस्तु, सजीववस्तुस निर्माण करते' हें तत्त्व अबाधित आहे.

 आतां वरील वनस्पति व प्राणी ह्यांपैकी वनस्पतिवर्ग प्रथम अस्तित्वांत आला असला पाहिजे. प्राणिवर्ग नेहमी वनस्पतिवर्गावर अवलंबून असतो. वनस्पतिवर्गाने अन्न उत्पन्न करावे, व त्यांवर प्राणिवर्गाने खुशाल उपजीविका करावी. वनस्पतिवर्ग जमिनीतील निर्जीव क्षारांपासून अन्नद्रव्ये तसेच वातावरणांतील आवश्यक वायूरूपी द्रव्ये शोषण करून आपले शरीरांत त्यापासून खरे अन्न तयार करतो. पण ही स्थिति प्राणिवर्गाची नसते. प्राणिवर्गास जमिनीतील निर्जीव क्षारापासून अन्न तयार करता येत नाहीं. अन्नाकरितां त्यास नेहमी वनस्पतिवर्गाकडे पहावे लागते. परमेश्वराने प्राणिवर्गाची निर्वाहाची साधने तयार करून नंतर प्राणिवर्गास जन्मास घातले.