पान:वनस्पतिविचार.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१९६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

नरम, कठीण, खरखरीत, केसाळ व पंखाकृति असते. शेवगा, मोहोगनी, बिगोनिया वगैरेमध्ये बीजास पंखे असल्यामुळे हवेतून एकाजागेपासून दुसऱ्या जागी त्यास जाता येते. मांदार व करवीरवर्गातील बीजास लहानसे झुपकेदार केसाळ आवरण असते. ह्या झुपकेदार केसाच्या साहाय्याने बीजे हवेतून इकडून तिकडे उडू शकतात. लहान मुलांच्या खेळांतील म्हातारी पुष्कळांनी पाहिली असेलच. सूर्यकमळ, झिनिया वगैरे बीजांत ह्याच प्रकारचा केसाळ भाग असतो. हे केसाळ पुंजके पुष्पकोशदर्शक चिन्हे आहेत. त्यांचा बीजाण्डाच्या आवरणाशी संबंध नसतो. कापूस, शेवरी वगैरेमध्यें वीजांभोवती पूर्ण केसाळ आवरण असते, त्या केसाळ रुईपासून पिंजून सूत काढून उत्तम उत्तम कपड़े तयार करितात.

 कधी कधी गर्भधारणा झाल्यावर जेव्हां बीज वाढू लागते, त्यावेळेस एखादे उप-आवरण छिद्राजवळ वाढते. एरंडीवरील बुडाशी असलेला पांढरा सुजवटा अशाच प्रकारे उत्पन्न होतो. जायपत्रीची उत्पत्ति ह्याच प्रकारचे असते. जायफळावरील बाह्यावरण जास्त वाढून पुढे ते सुटे व मांसल होते, हें मांसल आवरणच जायपत्री बनते. कमळाच्या जातीमध्ये कांहीं बीजावर अशा प्रकारचे बाह्य आवरण वाढून बीजाभोंवतीं एक पिशवी तयार होते.

 बाह्यांगाच्या कमी अधिक टणकपणाप्रमाणे बीजाची जननशक्ति असते. ही जननशक्ति पुष्कळ बीजांत वेगवेगळ्या प्रकारची असते. कांहीं बीजे एक दोन वर्षे राहिली असतां पेरण्यास निरूपयोगी होतात. पण तेच उलट कांही बीजे पन्नास वर्षांची जुनी जरी असली, तथापि त्यांची उगवण्याची चैतन्य शक्ती कमी होत नाही. कांहीं जुनी बीजे पेरण्यास अधिक चांगली समजतात, जसे-काकडी, खिरे, वगैरे. तसेच कांहीं वनस्पतींत जुनीं बीजें निरूपयोगी होतात. जसे-लिंबू, महाळुंग वगैरे. येथे एवढे सांगितले म्हणजे बस्स आहे की, बीजामध्ये कवचीवर हवेचा कोणताही परिणाम न होणारा टणकपणा असला तर ती बीजे जास्त दिवस टिकणारी असतात.

 बीजामध्ये अन्नाचा साठा असतो. ह्या अन्नाचा उपयोग बीज जननांत होतो. ह्याचा उगम बीजाण्डांत होतो. गर्भकोशांत जे द्वितीयक केंद्र मध्यभागी असते, त्यांशी उरलेले पुंतत्व मिलाप पावून तीन केंद्राचे एकीकरण होते. केंद्र