पान:वनस्पतिविचार.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२२ वे ].    फळ.    १८७
-----

सर्वच फळे मऊ व मांसळ होतात, असें नाहीं. कांहीं फळे सुकी होऊन लांकडासारखी कठीण बनतात. कठीण टणक होणे, वाळून जाणे अथवा मांसल होणे, हे व्यक्तिमात्र फळांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. तसेच त्याची वंशपरंपरा कायम राहणे, पक्ष्यादिगणापासून संरक्षण होणे, किंवा त्यांच्या संगोपनास जरूर लागणारी एखादी विशिष्ट स्थिति प्राप्त होणे, वगैरे गोष्टीसुद्धां फलांच्या विशिष्ट आकारास किंवा त्यांचे मऊ व टणक होण्यास कारणीभूत होतात. तसेच फळांवरील विशिष्ट केंस अथवा काटे किंवा त्यावरील पंखासारखे भाग वगैरे फळास उपयोगी पडतात. धोत्र्याचे फळांवर अगर एरंडीचे फळावर एक प्रकारचे कांटे येतात, ते फळाचे संरक्षण करण्याचे कामी उपयोगी पडतात. मधुमालतीचे फळास दोन पंख असतात, त्यामुळे ती फळे हवेतून सहज उडू शकतात. फळे गोड बनल्यामुळे पक्षी ती खाऊन त्यांची बीजे इकडे तिकडे फेकतात, त्यामुळे त्यांची वंशपरंपरा चोहोंकडे पसरली जाते.

 फळाचे बाह्यांग निरनिराळ्या तऱ्हेचे आढळते. खरखरीत, मऊ, लुसलुसित कांटेरी, तंतूंनी वेष्टलेले, आवरणानी परिवृत्त, असे वेगवेगळे बाह्यांग निनिराळ्या फळांत असते. ह्या सर्वांचा आपआपल्या परि थोडाबहुत उपयोग असतो. अण्डाशयाचा बाहेरील भाग हा फळाचे बाह्यांग बनतो. आंतील बीजे बाह्यांगांत वेष्टिली असतात. कांहीं ठिकाणी बाह्यांग अधिक वाढून आंतील बीजाची वाढ फार कमी होते, अथवा कधी कधी ते वाढतच नाहीं, जसे-सोनकेळे, कांहीं द्राक्षे, वगैरे. बेदाणा ज्या द्राक्षापासून तयार करतात तेथे बी मुळीच असत नाहीं. सोनकेळ्यामध्ये एक लांब सुतासारखा मध्यभागी दोरखंड असून त्यांत बीजें असत नाहींत. अशा पुष्ट फळांची बाह्यांगें खाण्याचे कामी जास्त उपयोगी पडतात. कित्येक फळांत बाह्यांगांत तीन स्पष्ट पदर दिसतात. जसे-आंबा, नारींग, खारीक वगैरे. आंब्यामध्ये पहिला पदर सालीचा असून दुसरा पदर आंतील रसाळ गीर बनतो. तिसरा पदर म्हणजे कोय होय. कोयींत बीज असते. आपण नेहमी आंब्यामध्ये गीर खातो, व त्याच्या मधुर रसाकरितां आंबा प्रसिद्ध आहे. नारिंगामध्य बाह्यांगाचा पहिला पदर पिवळा असून दुसरा पदर कापसासारखा पांढरा असतो. तिसरा भाग आंब्याचे कोयीप्रमाणे कठीण असून त्यांचे जाळ्यांप्रमाणे