पान:वनस्पतिविचार.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

कांहीं पाणवनस्पति पाण्यात बुडाल्या असतात व कांहीं अर्ध्या बुडाल्या असून वरचे बाजूस पाने येतात. पाण्यात बुडालेल्या वनस्पतींची मुळे कधी वाहती व लोंबत असतात. अथवा कधी चिखलांत बुडाली असतात. खोड बहुतकरून नाजूक व लांब असते. खोडामध्ये लाकडी तत्त्व वाढलें नसते. वाहिनीमय ग्रंथी (Vascular bundles ) कमी असतात. बुडालेल्या पानांवर बाह्यत्वचा फार पातळ असते, व त्वचारंध्रे असत नाहींत. पाणी जर धावते असले तर, पानें फाटकी असतात. फाटक्या भागांतून पाणी वाहण्यास सुलभ पडते. ज्यांची पाने पाण्यावर आली असतात, त्यास लांब व पोकळ देंठ असतो. जर पाणी खाली उतरत गेले तर बुडांकडे देठांची गुंडाळी होत जाते व पाणी पुनः जास्त चढत चाललें तर ती गुंडाळी सुटून पाने पाण्याबरोबर वर येतात. असल्या पानाच्या उपरी पृष्ठभागांवर त्वचारंध्रे असतात. पानांवर मेणाचे सारवण असल्यासारखे असते. त्यामुळे पाणी वर पडले असतां मोत्याप्रमाणे चमकत राहते.

 ही पाण-वनस्पतींची स्थिति त्यांना योग्य असते. त्यांची जीवनकार्ये ह्या रचनेमुळे न बिघडतां उलट त्या कार्याना साजेशी ती रचना असते. मुळ्यांचे रचना अथवा वाढ चांगली होत नाहीं. शोषक अवयवांची जरूरी असत नाहीं. त्यामुळे केस वगैरे मुळ्यावर पाण-वनस्पतीमध्ये येत नाहींत. निरिंद्रिय द्रव्यें सभोवतालच्या पाण्यातून केवळ मुळ्यांतूनच नव्हे तर पाण्यात बुडालेल्या सर्व भागांतून शोषिली जातात. बाष्पीभवनप्रवाह येथे सुरू असण्याची जरूरी नसते, म्हणून बाष्पीभवनसंबंधी रचना पूर्णावस्थेस पोहोचलेली नसते. पाणवनस्पतीमध्ये पेशीमध्यपोकळ्या मोठमोठ्या असून त्यांत हवा पूर्ण भरली असते. ह्यामुळे वनस्पतीचे शरीर हलकें होऊन तरंगण्यास योग्य होते. हवेनें भरलेल्या पेशीमध्यपोकळ्या असल्या वनस्पतीमध्ये हवेचे साठेच असतात. ह्या हवेचा उपयोग अंतरजीवन पदार्थासही होत असतो. पाण्यातूनच ऑक्सिजन वायू शोषिला जातो.

 जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतीस जर पाण्याचा भरपूर साठा मिळाला तर त्यांची पाने चांगली पूर्ण वाढतात. उलट पाण्याचा थोडासाच पुरवठा असला तर त्या मानाने पानांचा आकार कमी होतो. वालुकामय प्रदेशांत जमिनीत पाणी कमी असल्यामुळे वनस्पतीची पाने मुळीच वाढत नाहीत. आल्यास