पान:वनस्पतिविचार.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२ वे ].    बाष्पीभवन (Transpiration.)    १०५
-----



पुनः नवी पालवी फुटते. खरोखर उष्णता व थंडी ही दोन्हीं, पाने गळण्याची अप्रत्यक्ष कारणे आहेत. अति कडक उन्हाळा फार दिवस राहिला असतां पानांतून बाष्पीभवन फाजील होण्याची भीति असते. ते तात्पुरते बंद व्हावे म्हणून बाष्पीभवनाची साधने जी पाने तीच गळून जातात. म्हणजे एकपरीने पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन झाडांचे संरक्षण होते.

 ज्याप्रमाणे अति कडक उन्हाने सुकून पाने गळू लागतात, त्याप्रमाणे अति भयंकर थंडीच्या कडाक्याने पाने गळतात. जमिनीची उष्णता थंडीच्या कडाक्याने अगदी कमी होऊन जमिनीत शिरलेल्या मुळ्यांची शोषक्रियाही त्याबरोबर कमी होते. झाडावर असणाऱ्या पानांतून जितकें पाणी वाफ होऊन हवेत जाते, तितके पाणी सुद्धा मुळांतून शोषीलें जात नाही. ह्यामुळे पाने वाळून जातात; अथवा काळी डांबर फांसल्यासारखी दिसतात. म्हणूनच अति उष्णता व अति थंडी ह्या दोन्हींचा परिणाम पाने सुकण्यावर होतो. अर्थात पाने सुकली असतां तीं हळू हळू खाली पडतातच. ह्यास अप्रत्यक्ष कारण म्हणजे फाजील बाष्पीभवन पानांतून होणे हे आहे. त्याकरितां बाष्पीभवनाची साधने जी पाने, ती गाळून झाडे आपले संरक्षण करून घेतात. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पानांचे पडणे व्यक्तिमात्र जातीच्या निरनिराळ्या परिस्थितीवर अवलंबून असते.

 पुष्कळ लोकांचा समज असा आहे की, पाने हिवाळ्यांत बर्फ पडू लागले असतां गळू लागतात. जरी ही गोष्ट काही अंशी खरी आहे, तथापि केवळ बर्फामुळे पाने गळतात असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण पाने गळती, तर सर्व पाने एकदम गळाली पाहिजेत. पण तसे पुष्कळ झाडांत दिसत नाही. तसेच बर्फ पड़त नसतांना सुद्धा पाने गळतात, तेव्हां बर्फ पडणें हें पानाचे पडण्यास सबळ कारण आहे, असे म्हणता येणार नाहीं. एवढे म्हणता येईल की, बर्फ पडल्यामुळे पाने लवकर पडु लागतील म्हणजे बर्फामुळे पर्णपतनक्रिया लवकर सुरू होते.

 हवेचे फेरबदल, थंडी, उन्हाळा, वारा वगैरे कारणे बाह्य आहेत. प्रथमपासून ज्यावेळेस बाष्पीभवन कमी करावे, असे वनस्पतीस वाटते, त्यावेळेपासून पानांत तत्संबंधी अंतरखटपट सुरू होते. पानाच्या देठाच्या बुडापाशीं एक प्रकारचा नवीन पेशीसमुञ्चय उत्पन्न होतो. हा पेशीसमुच्चय उत्पन्न