अशा वाढण्याने गुरुत्वाकर्षण शक्तिसुद्धां मागे पडते. शोषणक्रिया सुलभ होणे हे पाण्याच्या कमी अधिक अस्तित्वावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर क्रिया अजीबात बंद पडणार. उन्हाळ्यात अथवा अवर्षणकाली जमीन सुकी होऊन पाण्याचा थेंबही जमिनीत राहत नाही. अशा वेळेस जमिनीत बीं पेरिले असता उगवणार नाही. जरी कदाचित् थोडे वरून पाणी घालुन उगवले, तरी जमिनीत पाण्याच्या अभावामुळे ते चांगले पोसणार नाहीं म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या मुळ्यांंस आपल्या शोषणक्रिया पाण्याचे अभावें बरोबर रीतीने चालविता येणार नाहीत. शोषक क्रिया बेताच्या झाल्यामुळे अन्नांचा साठा कमी होऊन झाड वाढावे तसे वाढत नाहीं.
मूलजनितशक्ति:-वनस्पतीस जरूर लागणारे निरिंद्रियक्षार व आम्लें ही सर्व पाण्याबरोबर वनस्पतिशरीरांत शिरतात. ही शोषणक्रिया मुळाकडून होते. दुसऱ्या कोणत्याही अवयवास अशी शोषकशक्ति असत नाहीं. ऑसमासिस क्रियेने बाह्यत्वचेच्या केंसांत प्रथम जमिनीतून पाणी शोषिले जाते व त्यामुळे ती केंसाची पेशी चोहोबाजूनी तणाणते. जवळील सालीच्या पेशींत त्याच क्रियेने पाणी जमत जाते. बाह्यत्वचेवर पुष्कळ केंस असल्यामुळे त्या सर्वांच्या आकर्षणामुळे पुष्कळसे पाणी आंत शिरून सालीचा प्रदेश तणाणून जातो. पेशींतील पाण्यामुळे भित्तिकेवर एक प्रकारचा अंतरजोर पडला असतो, सालींच्या प्रदेशांतील प्रत्येक पेशी-भित्तिकेवर पाण्यामुळे उत्पन्न होणारा जोर पडून भित्तिका पूर्ण चोहोबाजूनी तणाणल्या असतात व पाण्याचा उपसा झाल्याखेरीज नवीन पाणी आंत शिरणे शक्य नसते. मुळाच्या मध्यभागांकडे स्तंभामध्यें ( Stele ) काष्ठान्वित पेशी असतात. बाह्य प्रदेशांत पाणी खेचिलें असल्यामुळे त्या खेचण्याचा परिणाम आतील भागांवरही होतो. ह्या काष्ठपेशींच्या नळ्यांसारख्या वाहिन्या खोडांतून पानापर्यंत गेल्या असतात. जेव्हां सालींतील पेशी-भित्तिका पाण्याने तणाणून जातात, त्या वेळेस ह्या काष्ठवाहिन्या बहुतेक रिकाम्या असतात. खेचिलेले पाणी अगदी जवळच्या भित्तिकेंतून हळू हळू ह्या काष्ठवाहिन्यांत ओतिले जाते; पुढे ते जवळील पेशीतील पाणी आकर्षून लौकर जलदीने वर नेणे हा काष्ठवाहिन्यांच्या भित्तिकेचा स्वभावधर्म आहे. ह्याप्रमाणे पाण्याचा उपसा काष्ठवाहिन्यांत झाल्यावर पुनः नवीन पाणी केंसांतून पूर्वीसारखे शोषिले जाते, व पूर्वीसारखीच तणाणलेली