पान:वनस्पतिविचार.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

असते, त्याप्रमाणे क्षुद्रवर्गामध्ये नसते. तथापि क्षुद्र वर्गामध्ये जननेंद्रियाच्या मुख्य तत्त्वांत फरक नसतो. अतिक्षुद्र एकपेशीमय वनस्पतींत शरीरवर्धन व प्रजोत्पत्ति ह्यांत फरक आढळत नाहीं. मध्यम शुद्रवर्गात निराळ्या जननपेशी ( Spore) असतात. आतां ही गोष्ट खरी की, फुलासारखी जननपेशीची एका विशिष्ट जागीं योजना नसून जेथे त्यास योग्य जागा आढळते, त्याठिकाणी त्या जननपेशींचा प्रादुर्भाव होतो. दोन विशिष्टतत्त्वांचा मिलाफही येथे कांहीं ठिकाणी पाहण्यांत येतो. म्हणजे जशी जशी शरीरसंकीर्णता, वनस्पती मध्ये अधिक दिसून येते, त्याबरोबर इतर बाबींतही तेच तत्व अधिक अधिक स्पष्ट होऊ लागते.

 जसे शरीरवर्धन हे एक अवश्य कर्तव्य असते, त्याचप्रमाणे वंशवर्धनहीं तितकेच महत्त्वाचे दिसून येते. वंशवर्धन साधण्याकरितां वनस्पति आपल्या स्वतःचा नाश झाला तरी विशेष फिकीर करीत नाही. उद्दिष्ट हेतु साध्य करण्याविषयी पूर्ण दृढनिश्चय असतो. पुष्कळशा वनस्पति अशा आहेत की, बीजोत्पादन झाल्यावर लागलीच त्यांस मृत्यु येतो. बीज तयार झाल्यावर मृत्यु येणार अशी जरी त्यांची खात्री असते, तथापि बीज उत्पन्न करणे हे आपलें अवश्य कर्तव्य आहे, असे वनस्पति समजतात. बालसंगोपन जसे प्राणिवर्गात असते, तद्वतच वनस्पतिवर्गातही त्याचप्रकारचे आढळते. बीजास रुजण्याच्यावेळी उपयोगी पडण्याकरितां वनस्पति आपल्या घासांतून अर्धा घांस अलग करून त्यामध्ये सांठवितात. बीजे म्हणजे वनस्पतींचा वंश आहे. तेव्हां वंशवर्धनाकरितां व्यक्तीने खटपट करणे अथवा मृत्यु आला असतां त्यास न डगमगणे, हे सर्वसिद्ध तत्त्व वनस्पतीपासून श्रेष्ठ प्राणिवर्गानेही शिकण्यासारखे आहे, ह्यांत संशय नाहीं. कुळाची वाढ होण्याकारता एक जीव नाहीसा होतो; पण त्याबरोबरच शेंकडों नवे जीव उत्पन्न होतात, हा सिद्धांत वनस्पतिवर्ग नेहमी पाळीत असल्यामुळे, जीवनकलहांत इतक्या अडचणी असतांही त्यांचा वंश आजतागत अव्याहत चालला आहे,

 असो; ' पोषण व उत्पत्ति ' ही वनस्पतिचरित्रांत मुख्य असून ती वनस्पतीची अवयवें कशा रीतीने साधतात, इकडे आपण लक्ष देऊ. जननेंद्रियांसंबंधाने विचार, पोषणविचार झाल्यावर मागाहून करण्यात येईल. तसेच फुलांचे बाह्यांगवर्णन, निरनिराळे प्रकार, गर्भसंस्थापना, गर्भ, वगैरेंचा उल्लेख तेथेच करण्यांत येईल.

---------------