पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पिकून जून झाले म्हणजे त्यांतील जे वाटोळ्या आकाराचे असतात, त्यांचे तंबुरे व भंडारी लोक तुंबे करितात. या तुंब्याचा ताडी काढण्याच्या कामीं उपयोग करतात. एका अंगाला फुगीर व एका अंगाला लांबट, अशा आकाराचे जे भोपळे असतात, त्यांचे गारोडी वगैरे लोक ' नागशूर ' म्हणून एक प्रकारचे तोंडाने वाजविण्याचे वाद्य तयार करतात. याचे सुराला सर्प भुलतात. गोसावी, बैरागी, वगैरे लोक ताक, पाणी, वगैरे ठेवण्याच्या कामी भांड्यांऐवजी या फळांचा उपयोग करतात. प्राचीन काळी होड्या, नांवा वगैरे जलप्रवासाची साधने जेव्हां विशेष अस्तित्वात नव्हती, तेव्हां व सध्यांही ज्या ठिकाणी मोठाले ओढे व नद्या यांतून पलीकडे जाण्याला होडी, साकू वगैरे कांहीच साधन नसते. या ठिकाणी या भोपळ्यांचा फारच चांगला उपयोग होतो. अशा ठिकाणी या भोपळ्यांचे पेटे व सांगडी करुन त्यांच्या साह्याने लोक परतीराला जातात. पेटे व सांगडींकरितां भोपळे घेणे ते मोठे व जून असे पाहून घ्यावे. या कामासाठी कडू भोपळे वापरणे बरे. हे भोपळे मोठे व फार हलके असून त्यांची साल कठीण असते. दोन्ही काखेंत भोपळे धरून नदी उतरून जाण्याचे जे साधन त्यात 'पेटा' म्हणतात, आणि पांच सात भोपळे मजबूत सणाच्या दोरीनें मध्ये वीत दीडवितांचे अंतर ठेवून एकमेकांसमोर बांधून जें जलवाहन तयार करितात, त्यात सांगड असे म्हणतात. हिच्या साह्याने पोहणी न येणारा मनुष्यही चार दोन मणांचं ओझं घेऊन सांगडीवर बसून नदी उतरून पैलतीरास जाऊं शकतो. पेटे किंवा सांगडीचे भोपळे जोपर्यंत जवळ आहेत, तोपर्यंत मनुष्याला बुडण्याची धास्ती बाळगावयास नको. कडू व निरुपयोगी वाटणाऱ्या अशा वनस्पतींपासूनही अशा प्रकारचे महत्त्वाचे उपयोग होतात.

--------------------
२३ पतंग.

 मलबार, सिलोन, मद्रास, मुंबई, सयाम, ब्रह्मदेश वगैरे प्रांतीं पतंगाची झाडे पुष्कळ होतात. पतंगाच्या लाकडाचे तुकडे एक रत्तल व अधणाचे पाणी एक ग्यालन घेऊन निष्कर्ष करून तो प्रमाणाने अतिसार व श्वेतप्रदर यांवर दिल्यास गुणावह आहे, असे डॉक्टर बेरिंग साहेबांचे म्हणणे आहे. दंतमंजनामध्ये पतंगाचे लांकडाचा उपयोग होतो, असे डॉ० शाह आपले ग्रंथांत वर्णन करतात. पतंगाचे झाडाचा विशेषेकरून रंगाच्या कामी उपयोग होतो. हे झाड पक्वदशेला येण्याला सुमारे चवदा पंधरा वर्षे लागतात. रंगारी लोक पतंगाच्या लांकडाचे ढलपे काढून, ते ढलपे, लाख व तुरटी हे तिन्ही जिन्नस एकत्र करून दोन दिवसपर्यंत पाण्यात भिजत घालतात, दोन दिवसांनंतर ते मिश्रण कढवितात. म्हणजे तांबडा रंग तयार होतो. ज्या कपड्यांस हा रंग द्यावयाचा असेल तो कपडा पलंगाची झाडे ल्यास गुणावह निष्कर्ष करून तोकडे एक रत्तली