पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/539

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. संन्यासापेक्षां अधिक असें सांगितल्यानंतर निष्काम कर्मयोगाचे सिध्दयर्थ अवश्य लागणारी निष्कामबुद्धि संपादन करण्यास साधनें कोणतीं, आणि संन्यासमार्गीप्रमाणें निष्काम मार्गानेंही मोक्ष कसा मिळतो, हें सप्रमाण सिद्ध करून दाखविणें जरूर होते. पैकी निष्कामबुद्धि संपादन करण्याचे साधन म्हणून अर्जु नाच्या प्रश्नावरून पातंजलयेोगातील आसनाचे व चित्तनिरोधाचे सहाव्या अध्यायांत निरूपण आले आहे. पण चित्तनिरोधाचे हें काम एकाच जन्मांत सिद्ध न झाल्यास मनुष्य बुडालाच असें समजावयाचे कीं काय, अशी अर्जुनास शंका आल्यामुळे निष्काम कर्मयोगात काहीं फुकट जात नाहीं. यथाशक्ति प्रयत्न करीत गेले म्हणजे पूर्वजन्मींचे संस्कार पुढे कायम राहून आज नाहीं तर उद्यां, या जन्मीं नाहीं तर पुढील जन्मीं तरी, कर्मयोगार्ने अखेर खास सिद्धि प्राप्त होते, असें भगवंतानीं आश्वासन दिले आहे. परंतु बुद्धि निष्काम होण्यास पातंजल योगापेक्षांही अध्यात्मचिंतन आणि अध्यात्मचिंतनापेक्षांही भक्ति ही महत्त्वाची व सुलभ साधनें होत; व यांचा विचार ७ पासून १७ अध्यायापर्यंत केला आहे. अध्यात्मविचार करण्याची पद्धत अशी आहे कीं, प्रथम बाह्य सृष्टीचा विचार करून त्याच्या बुडाशीं काय तत्त्व आहे हे ठरवावयाचे; यास क्षराक्षर विचार असें म्हणतात. हा विचार कपिल--सांख्य शास्रांत केलेला आहे; म्हणून तदनुरोधाने गीतेंतील ७ -८-९ व पुढे चैौदापासून सतरा अध्यायातील वर्णनें केलेली आहेत. क्षराक्षरांचा याप्रमाणें विचार केल्यावर मनुष्यांच्या देहांत चालकशक्ति कोणती याचा विचार करावा लागतो व तो तेराव्या अध्यायांत केला आहे. यास क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार अर्से म्हणतात. क्षराक्षर व क्षेत्रक्षेत्रज्ञ यांचा याप्रमाणें विचार झाल्यावर दोहींकडे अखेर जीं तत्त्वें निष्पन्न होतात तीं दोन नसून एकच आहेत. जें पिंडीं तें ब्रह्माडीं असें सिद्ध करावें लागतें; व हेंच सर्व वेदांताचे रहस्य होय. यासच परब्रह्म किंवा भक्तिशास्त्रातील परि - भाषेत पुरुषोत्तम असे म्हणतात. या परमतत्त्वाचे अनुभवात्मक ज्ञान होऊन बुद्धि आत्मनिष्ठ किंवा ब्रह्मनिष्ठ म्हणजे सर्वोभूतीं सम व शात होणें हाच खरा मोक्ष होय, मोक्ष ही एक विशिष्ट प्रकारची अध्यात्मिक मनोवस्था आहे; इहलोकाच्या पलीकडे ठेवलेला गड्डा नव्हे-मोक्षस्य न ही वासेोस्ति न ग्रामांतरमेव वा । अज्ञानहृदयग्रंथिनाशी मोक्ष इति स्मृत: ॥-असें शिवगीर्तेत म्हटलें असून भगवद्रीतेचा व उपनिषदांचा सिद्धांत तसाच आहे. ही अध्यात्मिक स्थिति ज्या पुरुषास प्राप्त झाली त्यास जीवन्मुक्त असे म्हणतात; व अशा प्रकारची जीवन्मुक्तावस्था संपादन करून त्यात सिद्ध झालेल्या निष्कामबुद्धीनें लोकसंग्रहार्थ आमरणांत निष्काम कर्म करीत राहणें हेंच गीतेंतील सर्व उपदेशाचे सार होय. अशा ज्ञानी पुरुषास त्यानें केलेल्या निष्काम कर्माचे पापपुण्य लागत नाहीं इतकंच नव्हे, तर त्याची कर्म करण्याची जी रीत तीच इतरांस कित्त्यासारखी होऊन त्यामुळे लोकांची स्थिति उत्तरोत्तर सुधारत जात असते. हाच खरा लोकसंग्रह