Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/422

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४०७
मराठी भाषेची लेखनपद्धति.

अडचण सांगितली तर त्यास ह्या पक्षाचे उत्तर असें आहे कीं, आमचा नियम समासास लागूं करूं नये. परंतु कां करूं नये, याचे सशास्र कारण ते देत नाहीत. या दोन्ही पक्षांचा विचार करता आम्हांस असे वाटतें कीं, संस्कृतांत ज्याप्रमाणें शब्दाचे मूलरूप व विभक्त्यन्त रूप असा भेद आहे; तसा मराठी व्याकरणातही करून या शब्दाचीं मूलरूपें ' कवि ’ ‘ भानु ' ' साधु ’ ' रवि ’ याप्रमाणें -हस्वान्त्य स्वराची मानून प्रथमान्तरूपें मात्र प्राकृतांत विसर्ग लोप झाल्यामुळे ‘ कवी, ' भानू ' ' साधू, ’ ‘ रवी, ’ अशीं दीर्घ होतात, असा नियम करावा. मूळ रूपाचे अन्त्यस्वर -हस्व मानल्याने व समासांत मूळरूपच कायम रहात असल्याने समासघटित शब्द लिहितवेळीं त्यांतील ' कवि रवि' वगैरे शब्द -हस्वच लिहिण्यात येतील; व ते -हस्व का लिहावयाचे याची उपपत्तीही चांगली देता येईल. ही व्यवस्था विद्यार्थ्यांस विशेषेकरून लहान मुलांस सोयीची होईल असे नाहीं. कारण ' कवि ’ ह्या शब्दाचा अन्त्यस्वर -हस्व असून त्याचे प्रथमेचे एकवचन ' कवी ’ असें होते, या दोन्ही गोष्टी त्यास लक्षात ठेवाव्या लागतील. परंतु लहान मुलांच्या सोयीकरतांच मराठी भाषेची लेखनपद्धति ठरवावयाची नाही, हे लक्षांत आणले म्हणजे या आक्षेपाचे काहीं महत्त्व राहात नाहीं. दुसरी गोष्ट अशी कीं, ' कवि ’ शब्दाचा अन्त्यस्वर दीर्घ मानल्यानें त्याचे अनेकवचन ' कव्या ' करावे लागेल, अशी जी कित्येकांनी शंका काढली आहे तीही आम्ही जो वर नियम दिला आहे त्याप्रमाणें शिल्लक राहात नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणे नियम घातला तर धडयाच्या आरंभीं शब्द लिहितात तेव्हां ' कवि ' ' रवि ’ या शब्दाचे अन्त्यस्वर -हस्व लिहून पुढे वाक्यात त्याची प्रथमान्तरूपें दीर्घ लिहावी लागतील. इतके झाले तरी संस्कृताप्रमाणेच कोणी या शब्दाचे अन्त्यस्वर नेहमीच -हस्व लिहिल्यास ते चूक आहेत, असे म्हणता यावयाचे नाही. कारण, मराठी भाषेचा अंमल सदर भाषेत येणाच्या संस्कृत शब्दांवर किती चालावा याबद्दल अद्याप एकमत झालेले नाहीं; व मराठी भाषेची स्थितिही अद्याप इतक्या पूर्णावस्थेस आली नाहीं कीं, मराठीनें आपलाच अंमल सर्वत्र चालू करावा. ' स्थिति गति ’ वगैरे ब-याच शब्दाचे अन्त्यस्वर कांहीं लोक -हस्व लिहितात व काहीं लोक दीर्घ लिहितात; इतकेच नव्हे तर एकच लेखक कधीं हे अन्त्यस्वर -हस्व तर कधीं दीर्घ लिहितो, याचे कारण हेंच होय. संस्कृत ' गति रीति' ' जाति, ’ याचीं रूपें मराठीत ' गत, ’ ‘रीत ’ किंवा ' जात ’ अशीं अकारान्त जेव्हा रूपे होतात तेव्हा मात्र त्यास शुद्ध मराठी रूप प्राप्त होते, असे म्हणता येईल. -हस्व इकारान्त किंवा उकारान्त शब्दासंबंधानें वर जो आम्हीं नियम दिला आहे तो ज्यास विभक्तिप्रत्यय लागतात अशा शब्दांपुरताच असल्यामुळे ' आणि, ’ ' तथापि, ' परंतु ' वगैरे अव्ययांचे अन्त्यस्वर संस्कृतल्याप्रमाणेच -हस्व लिहावे असें आपोआप निष्पन्न होतै; त्याकरितां अपवाद म्हणून निराळा नियम देण्याची जरूर नाहीं. सारांश, समासांतील