Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४०३
मराठी भाषेची लेखनपद्धति,

रुपे दोन दोन असतात किंवा 'व' च्या ठिकाणीं 'ब' होतो अथवा 'ड' वा ' ळ ' होतो, हें संस्कृत भाषा जाणणार्यांच्या लक्षांत असेलच, परिपूर्ण दशति पावलेल्या भाषेच्या वैयाकरणास जर त्या भाषेस अशी मोकळीक द्यावी लागेल तर मराठी भाषेस तिच्या हल्लींच्या स्थितींत यापेक्षां पुष्कळ मोकळीक दिली पाहिजे. ही गोष्ट निर्विवाद आहे. सारांश, आजच जर मराठी भाषेतील सर्व शब्दांस प्रत्येकीं एकेक निश्चित रूप देण्याचा कोणी प्रयत्न करील तर तो पुष्कळ कठीण जाईल; इतकेच नव्हे तर भाषा बोलणारे किंवा लिहिणारे लोक अशा प्रकारच्या निबंधास कधीही जुमानणार नाही. भाषेतील घोंटाळा काढू नये, असें आमचे म्हणणें नाहीं. उलट, भाषेतील घोटाळे काढणें हेंच वैयाकरणाचे कर्तव्य आहे, असें आम्ही समजतो. स्त्रियास केश संस्कार किंवा केस वेिंचरून वेणीफणी करणें हें जितके इष्ट व अवश्य होय तितकेच भाषॆतील शब्दास सुसंस्कृत करणे अवश्य होय. तथापि केश संस्कारात केश कापण्याचा किंवा वपनाचा जसा अंतर्भाव होत नाही, त्याप्रमाणेच शब्दाची वाढ कुंठित करणें किंवा कापणें या गोष्टी व्याकरण संस्कारात येत नाहीत. हे नियम व प्रतिनियम वाचून कित्येकास आश्चर्य वाटेल. पण त्यास आमचा कांही इलाज नाहीं. नियमापेक्षा प्रतिनियम कोठे अधिक महत्त्वाचा समजावा, याबद्दल निरनिराळ्या वैयाकरणांचे मतभेद असू शकतील. पण वर सागितलेल्या सर्वसोयी व अडचणी लक्षात ठेवूनच शब्द स्वरूपाचे नियमन केले पाहिजे, याबद्दल कोणाचा मतभेद असेल असे आम्हास वाटत नाहीं मराठी शब्दाच्या स्वरूपाची मीमांसा करून याबद्दल काही विशिष्ट नियम ठरविणे म्हणजे भाषेवर जुलुम करणे होय, असे जे कित्येकांचे म्हणणे आहे तें आम्हास बिलकूल मान्य नाहीं. प्रचलित लेखनपद्धतीहून सर्वांशी भिन्न अशी लेखनपद्धती प्रचारात आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारची दांडगाई करणे आहे, अथवा हीं एक प्रकारची मोगलाई आहे; इतकेच जर कोणाचे म्हणणें असेल तर ते काहीं गैरवाजवी नाही. परंतु रा. रा. साने, गोडबोले व हातवळणे याच्या ' मराठी भाषेची लेखनपद्धति ' या पुस्तकात जशी झोटिगबादशाही केल्याचे किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचे आमच्या पाहण्यात आले नाही. ज्या ठिकाणीं उच्चारांत विकल्प आढळण्यात येतों अथवा उच्चारांत आणि लेखनपद्धतीत भेद असतो, तेवढ्याच स्थलीं व्याकरण शास्त्राच्या नियमाची प्राप्ती होते, हें तत्त्व वरील तीन ग्रंथकार विसरले आहेत असें आमच्या नजरेस येत नाही. त्याचीं सर्व मते प्रत्येकास ग्राह्य होतील असें नाहीं. तथापि, शुद्धलेखन हें एक शास्त्र आहे व मराठींत शास्त्रीय पद्धतीनें त्याचा विचार करण्याची काय साधने आहेत, हे पाहाण्याचा या ग्रंथाखेरीज इतक्या व्यापक रीतीनें दुस-या कोठे प्रयत्न झाला असल्याचे आमच्या पाहाण्यांत नाहीं. आता या ग्रंथांने मराठी भाषेतील शुद्धलेखनाचा एकदम कायमचा निकाल होईल असें मानणें चुकीचे आहे. तरी