Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३५८
लो० टिळकांचे केसरींतील लेख.

कर्ते या नात्यानें पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांस ते आपलेचसे वाटत असतात ही गोष्टं सर्वमान्य आहे. आणि अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर हे आमच्यापैकींच एक तत्त्वज्ञानी होते असे म्हणण्यास आम्हांस कांहींच शंका वाटत नाहीं. शिवाय, अलीकडील आमच्या इंग्रजी युनिव्हर्सिटींतून निघालेल्या विद्वानांस तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे जे मिल्ल अदिकरून प्रसिद्ध ग्रंथकार त्यांतील स्पेन्सरसाहेब हे अग्रगण्य होत; व यांच्या विचारांची छाप इंग्लंड, अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देश यातील विद्वानांवर जितकी बसलेली आहे तितकी किंवा त्याहून थोडी अधिकही आमच्याकडील विद्वान् मंडळीवर बसलेली आढळून येते. इतकेंच नव्हे तर, कोणीही आधुनिक विद्वान् एखाद्या विषयाचा विचार करूं लागला तर तो बहुतेक स्पेन्सरसाहेबांनीं घालून दिलेल्या उत्क्रांतीतत्त्वाच्या दिशेनेच करीत असतो. सारांश, आपल्या खोल व प्रगल्भ विचारांनीं जगांतील लोकांच्या विचारपद्धतीस कायमचे नाहीं तरी बरीच वर्षे टिकेल असें वळण लावून देणारे जे विशाल बुद्धीचे पुरुष कधी कधीं जगांत निर्माण होतात त्यांच्या यादीतच स्पेन्सरसाहेबांचे नाव घातलें पाहिजे. अणि त्यांच्या चरित्राचा जो विचार करावयाचा तोहि याच दृष्टीनें केला पाहिजे.
 तत्त्वज्ञान हा विषय हिंदुस्थान देशांतल्या भूमिकेस किंवा लोकांस अपरिचित आहे असे नाही; किंबहुना या विषयाचे आदिस्थान हाच देश होय असें म्हटले तरी चालेल. पृथ्वीवरील कोणतेही राष्ट्र सुधारलेल्या अवस्थेत येण्यापूर्वी आमचा देश सुधारणे या शिखरास पोहचलेला होता, समाजाची व्यवस्थित रचना होऊन मनुष्याच्या ऐहिक सुखास जी काहीं साधने लागतात तीं सवे हिंदुस्थानांतील लोकांस फार प्राचीन काळींच उपलब्ध झालेलीं होतीं; आणि उत्तरेस हिमालय पर्वत, पश्चिमेस सिंधुनद, पूर्वेस ब्रह्मपुत्रा आणि सभोवार समुद्र अशा स्वाभाविक मर्यादेनेंच इतर रानटी लोकांच्या उपद्रवापासून बचाव झाल्यामुळे या देशातील लोकांचे लक्ष जगाच्या बुडाशीं जी गूढ तत्त्वें आहेत त्याचा विचार करण्याकडे लागलेले होतें. उपनिषदादि ग्रंथ किंवा सांख्य, न्याय, योग, इत्यादि तत्त्वज्ञानाच्या निरानराळ्या पद्धती याच वेळीं या देशांत निर्माण झालेल्या आहेत; आणि त्यातील विचार इतके काहीं प्रगल्भ आहेत; कीं, आज विसाव्या शतकांतील तर्कशास्त्राच्या कसोटीवरही त्याची बावनकसी रेषा अद्याप जशीच्या तशी उमटत आहे. या देशांत इंग्रजी राज्य होईपर्यंत याच तत्त्वविचारांनचे प्राबल्य होतें व तत्कालीन विद्वान् लोकाच्या जिज्ञासेची त्यानें तृप्ती होत असे. परंतु इंग्रजी राज्य झाल्यानंतर हा पूर्वीच्या विद्येचा व विचाराचा मनु पालटला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधिभौतिशास्त्राची जी विलक्षण वाढ झाली तिची ओळख इंग्रजी शिक्षणाच्याद्वारें आमच्या नव्या मंडळीस होऊं लागली; आणि पूर्वीच्या तत्त्वज्ञानावरील संस्कृत ग्रंथाचे अध्ययन प्राय:लुप्त झाल्यामुळे आमचे जुनें तत्त्वज्ञान जुन्या परिस्थितीत कितीही योग्य व उत्तम असले तरी