Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४३
कै० श्रीधर गणेश जिनसीवाले.

असत. अनेक देशांच्या इतिहासाच्या वाचनाने आपल्या देशाच्या राजकीय स्थितीसंबधानेंही त्यांचे विचार राज्यकर्त्यांस किंवा त्यांच्या खुषमस्क-यांस गोड न वाटतील अशा प्रकारचे होते. तथापि परमेश्वरकृपेनें आमचा देश याही विपत्तींतून केव्हांना केव्हां बाहेर पडेल असा त्यांचा स्वत:च्या मनोवृत्तीवरून व इतिहासाच्या वाचनानें पूर्ण ग्रह झाला असल्यामुळे त्यांनी यासंबंधाची आपली मते स्पष्टपणें बोलून दाखविण्यास कधीही कसूर केली नाहीं; किंबहुना हें आपले प्रमुख कर्तव्य आहे असा त्यांचा ग्रह झालेला होता. व त्यांची वाणी जात्याच रसाळ असल्यामुळे एखाद्या प्रसंगीं अनेक देशांच्या इतिहासाच्या आधारें जेव्हां या देशाच्या स्थितीसंबंधाने ते बोलत तेव्हा हजारों लोकांच्या चित्तवृत्ति त्यांच्याप्रमाणेच क्षणभर क्षुब्ध झाल्याखेरीज राहत नसत. अमुक एक विषय अमुक एक काळांत व्यवस्थित रीतीनें मांडण्याची किंवा तो कागदावर लिहून काढण्याची शैली प्रोफेसर साहेबांच्या अंगांत नव्हती हें खरें आहे; आणि त्याचप्रमाणें दहापांच माणसें एकेठिकाणीं गोळा करून त्या सर्वांस आपल्या कह्यांत ठेवून एखादें कार्य सिद्धीस नेण्यास ज्या गुणांची अंगी अपेक्षा असते तशा प्रकारचा गुणही प्रो. जिनसावाले याच्या अंगीं विशेष नव्हता असे म्हटले तरी चालेल. पण अमुक एक गुण अंगीं नाहीं, म्हणून एखाद्या पुरुषाच्या अंगी असलेल्या इतर गुणांचेही गौरव न करणें आमच्या मते दुर्जनतेचे लक्षण होय. देशाबद्दल खरी कळकळ व प्रेम, इतिहासाचे विस्तृत व व्यापक अवलोकन, सतत विद्याव्यासंग, अलीकडे सुशिक्षितांमध्ये ज्या व्यसनाचा प्रसार होत चालला आहे त्यापासून किंवा इतर व्यसनांपासूनही आलिप्तता, शुद्ध आचरण, सत्यनिष्ठा, गोड आणि अस्खीलत वाणी, स्वधर्मावर पूर्ण निष्ठा, आणि तीनतीन चारचार तासपर्यंत अस्खलित भाषण करण्याइतकें शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य हे गुण जर कोणाही पुरुषास लोकमान्य व लोकप्रिय होण्यास पुरेस नाहीत; तर ज्या देशांत अशी स्थिति आहे त्या देशाचे दुर्दैव होय असे समजले पाहिजे. प्रो. जिनसीवाले यांच्या भाषणांत पाल्हाळ पुष्कळ असे, असा एक त्यांजवर आक्षेप होता. पण हें लक्षात ठेवावयास पाहिजे होतें कीं, ते जीं व्याख्यानें देत तीं ज्ञानेच्छूकरिता होती; व ज्यास सदर ज्ञातीची आपेक्षा नाहीं त्यानीं व्याख्यान सोडून जाण्यास प्रो. जिनसीवाले यांची कधीही हरकत नव्हती. ' वाणी ममैव सरसा यदि रंजयित्री न प्रार्थये रसविदामवधान दानम् ॥ ’ या तत्त्वावरच त्यांची मोठी भिस्त होती; आणि ते उभे राहून बोलू लागले असतां त्याच्या रसाळवाणीनें पुष्कळ लोकांस त्यांच्या इच्छविरुद्धही बंदिवान करून सोडलेले आहे. असो ; गेल्या नोव्हेबर डिसेंबरात पुण्यास प्लेग असल्यामुळे त्याचे मित्र डॉ. तळवळकर यांचेकडे बडोद्यास राहण्यास ते गेले होते, व तेथून नुकतेच ते मुंबईस आले असून गणपतीचे उत्सवाकरितां पुण्यास येण्याचा त्यांचा विचार होता. बडोद्यास त्यांचीं काहीं व्याख्यानें झालीं आणि मुंबईसही नुकतेंच नॉव्हेल्टी थिएटरांत