Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पेशवाईतील कारभार, रीतरिवाज आणि नीतिमता.

२७५

 न्या. रानडे यांच्या व्याख्यानांतील दुसरा वादग्रस्त मुद्दा म्हटला म्हणजे सामाजिक सुधारणेचा होय. निबंधकारांचीं समाज सुधारणेबद्दलचीं मर्ते प्रसिद्धच आहेत. हीं मतें बरीं कां वाईट याचा आम्हीं मार्गे अनेक प्रसंगीं खुलासा केला आहे. त्याचे आज विवेचन करण्याची जरूर नाहीं पेशव्यांच्या रोजनिशीवरून आपल्या समाजसुधारणेच्या कांहीं मतास बळकटी येते असा जो निबंधकारांचा आशय आहे तो चुकीचा आहे, एवढेच आज दाखविण्याचा आमचा इरादा आहे. न्या रानडे यांची नेहमींचीच अशी पद्धत आहे कीं, केोणत्याही गोष्टीस आपणास अनुकूल असें होईल तितकें करून स्वरूप द्यावयाचे, व या पद्धतीस अनुसरूनच हल्लींच्या निबंधांतही त्यांनीं थेोडाबहुत प्रयत्न केला आहे. पेशवाईत जातीजातीमधील तंटें, लमें, बहिष्कार, कन्याविक्रयानेषेध, मद्यपान वगैरे धर्मविषयक सामाजिक बाबतीतही सरकार हात घालीत असे, इतर्केच नव्हे तर सरकारास तशा प्रकारें हात घालण्याचा अधिकार आहे अशी लोकांची समजूत होती हें निर्विवाद आहे, पण या दाखल्यावरून इंग्रजसरकारासही तसा अधिकार येतो असें ध्वनित करणारांनी हें लक्षांत ठेविले पाहिजे कीं, सरकार स्वधर्मी आणि स्वदेशी असतां त्यांच्या हातांत जे अधिकार असणें इष्ट असतें ते सर्व अधिकार परधर्मी आणि परकी सरकारानें हातांत घेणें योग्य व इष्ट नाहीं. इंग्रजी मुत्सद्दयांनीं हें तत्त्व पुरतेपणीं ओळखलें आहे व हिंदुस्थानांत इंग्रजसरकारनें जें धर्मौदासिन्य पतकरलेले आहे तें एवढ्याचकरितां होय. इंग्लंडांत राणी ही धमीची संरक्षक आहे व तिकडील खिस्तीधर्माच्या देवळाचे खातेंही तेथील राज्यव्यवस्थेचे एक अंग आहे. सारांश, पेशवाईत पेशवे जो अधिकार चालवीत असत तोच किंवा तशा प्रकारचा अधिकार इंग्लंडांत राणीसाहेबाकडे किंवा पार्लमेंटाकडे आहे. धमीच्या बाबतीत मुख्य अमल पीपकडे न राहतां राजाकडे रहावा याकरितां येवढी खटपट झाली हें इतिहासांत नमूद आहे. आमच्याकडे तशा प्रकारचा धर्मगुरूंचा व राजाचा तंटा होण्याची वेळ आली नव्हती. पण कांहीं ठिकाणीं धर्मगुरूच्या सल्लयानें व कांहीं ठिकाणीं स्वतंत्र रीतीनेंही पेशवे धर्मविषयक सामाजिक बाबतींचीही व्यवस्था लावीत असत हें उघड आहे; परंतु इंग्रज सरकारास तशा प्रकारचे वर्तन ठेवतां यावयाचे नाहीं. एका धर्माच्या लोकांनीं दुस-या धर्माच्या लोकांच्या धार्मिक बाबतीत हात घालणें इष्ट नसतें इतकेंच नव्हे, तर त्याचे परिणामही चांगले होत नाहीत. जेो तो आपली धर्मसमजूत खरी मानीत असतो आणि स्वत:पुढे आलेल्या कोणत्याही प्रश्नाचा निकालही तो आपल्या समजुतीप्रमाणेच करीत असतो; त्यामुळे त्याने कोणत्याही गोष्टीचा केलेला निकाल त्याहून भिन्न समजुतीच्या लोकांस मान्य न होतां उलट त्यापासून लोकांचा असंतोष मात्र जास्त वाढतो. इंग्रजसरकारनें धर्माच्या बाबतीत जी तटस्थ वृति स्वीकारली आहे ती एवढ्याचकरितां होय. व ती सोडून देणें कधीही वाजवी होणार नाहीं,