पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कळेल तिथे द्यापाल नाही कर मानेल ती ती मुभा चंद्रभागेच्या तीरा।
ध्वज पताका सोडून साधु नाचतात देवळी।
चरण रूळ करि चिपळ्या वदती गरवाने नामावली।

 दोन मनोऱ्यांची माहिती सांगणारी लावणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिल्या अली आदिलशहाच वेळची इब्राहिम खानाने बांधलेली मशिद व बाजूचे १०६ फूट उंचीच्या मनोऱ्यांचे वर्णन तिच्यात आहे.

 पेशवाईच्या काळात गंगाघाटाची लावणी ही खूप प्रसिद्ध होती. संतांनी त्याच्या 'अभंगांमधून जसे उपदेश केले तसा उपदेश लावणीकरांनीही त्यांच्या रचनांमधून केला आहे. रामजोशी, प्रभाकर, होनाजी अशा लावणीकारांनी अशा रचना केल्या आहेत. रामजोशींनी त्यांच्या 'मला जन्म' या लावणीत म्हटले आहे.

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरी।
मठाची उठाठेव का तरी।
वनात अथवा जनात हो का मनांत व्हावे परी।
हरीचे नाव भवंबधी तरी।
काय गळ्यात घालुनी तुळशीची लाकडे।
ही काय भवाला दूर करतील माकडे।

 लावणीकारांनी वैराग्यपर वा उपदेशपर लावण्यामधून लोकांनी भक्ती करावी; पण भक्ती करण्याआधी हितकर अशा गुरूला भेटावे, त्याशिवाय दुसरा धंदा करू नये. गुरूला भजतात तेच मुक्तीला जातात. जे गुरूला भजत नाहीत ते लाथा खातात, असं मत व्यक्त करतात.
 अनेक वेळा प्रासंगिक लावण्या लिहिल्या गेल्या आहेत. समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब लावण्यामधील रचनेत जाणवत राहिलं अहे. अनंत फंदीनी त्या काळात पडलेल्या दुष्काळाचे चित्र त्यांच्या लावण्यांत रेखाटले आहे. दुष्काळात माणसातला माणूस उरला नाही. दुष्काळानं चोरी लुटेरीगिरी वाढली, हे सांगताना तो लिहितो.

जिकडे तिकडे टोळ माजले दुनियेचे केले वाटोळे
मुलखकूल उजाड हलकल्लोळ अंगावरचे चमड्याचे ओळ
कुठवर घालती हळदीबोळ जी सापडली तिलाच घोळ
घरे दारे जाळुनिया कोळ गरिबाभोवते माजलेत पोळ

 या प्रासंगिक लावण्यामधून तत्कालीन परिस्थितीचे चित्र समजते. सर्वच वर्णन खरं मानता येत नसलं, तरी काय घडले असेल, याची कल्पना येण्यासाठी ते पुरेसं आहे.
लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ४५ ॥