पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

शेवया बोटव्यांनी  उतरंड्या आगाशी
भाऊ चालला उपाशी
घरी वासाचे तांदूळ  काय करता असून
सासुरवाशी गं भैन
घराच्या वळचणीत  उभी हाईली भैन
म्हणे दादा जा भेटून

 घरात सगळं आहे; पण सासुरवास असल्यामुळं तिला भावासाठी काही करता येत नाही. घंगाळ्यात पाणी देता येत नाही, शेवया बोटव्याची खीर करता येत नाही, वासाच्या तांदळाचा भात करता येत नाही. बहिणीची ही अवस्था भावाच्या लक्षात येते, तोही मग मुकाट परततो. घराच्या वळचणीला उभी राहून डोळे पुसत बहीण भावाला निरोप देते. पुन्हा भेटून जा म्हणते. जिनं ही ओवी रचली असेल, ती अशाच परिस्थितीतून गेली असेल त्यामुळे ती वेदना या ओवीत जिवंत झाली आहे. सासुरवाशिणीचा आणखी प्रकार एका ओवीतून सामोरी येते. बहिणीची खुशाली पुसायला एक भाऊ तिच्या घरी गेला आहे. तिची त्यानं विचारपूस केली आहे. तेव्हा बहीण त्याला म्हणते त्याची ओवी ही विलक्षण वेदना सांगून जाणारी आहे आणि ही वेदना तिनं उपमेनं सूचित केली आहे.

बंधुजी विचारीतो  भैना सासुरवास कसा
सावळ्या बंदुराया  बरम्या लिवून गेला तसा
बंधुजी विचारीतो  भैना सासुरवास कसा
चिताकाचा फासा   गळी रूतला सांगू कसा

 घरच्या सासरवासाबद्दल प्रत्यक्ष न सागंता ती म्हणते ब्रह्मदेवाने कपाळावर ओढलेल्या रेषेप्रमाणे सगळं चाललं आहे. पुढं ती सांगते सोन्याचा दागिना ज्याला तिनं 'चिताक' म्हटलं आहे. ते गळ्यात घातलेवर रुतून नकोसा वाटावा तसं माझं चाललं आहे. सासुरवास हा जात्यावरच्या ओवीचा जिव्हाळ्याचा विषय असावा कारण रोज काही ना काही घडतं ते सगळं सागायचं कोणाला तर ईश्वर, सखी, सुहृद मानलेल्या जात्याला. सासुरवास हा सहन करणाऱ्याला कळतो. लांबून पहाणाऱ्याला बऱ्याचवेळा तिचं सगळं साजरं चाललय वाटतं; पण प्रत्यक्षात ते तसं नसतं. एका ओवीत त्याचं सुंदर वर्णन येतं. वर्णन सुंदर असलं तरी त्यामागचं दु:ख मात्र मनाची कासावीस करणारं आहे.

राजबन्सी गं पाखरू/ चोचीमंदी दुखावलं
मोत्या नि पोवळ्याचा / चारा खानं इसरलं
उन्हाळ्याचं उन / झाडाला नाही पान
जंगल पाखराचं/ उदास झालं मन

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ २७ ॥