"बायकोशी बोलायलादेखील तुला फुरसद नाही? मला, बानोला हाक मारायलादेखील सवड नाही? कुठं जातोस? काय करतोस? काय खातोस? काय-विचारायचे तरी काय तुला? कसली अवदसा आठवली आहे?"
सदुद्दीनने संथपणे बापाला उत्तर दिले, "अब्बाजान, या दुर्दशेने मी बेचैन झालो आहे. या दुर्दशेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे."
"बाहेर भटकून कसला मार्ग शोधणार आहेस?"
"बाहेर भटकून मला मार्ग सापडला आहे. मी काय करतोय ते कळतेय मला! त्यामुळे ही दुर्दशा नष्ट होणार आहे. पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आपल्याला लाभणार आहेत!"
"पुन्हा पूर्वीचे दिवस? वैभवाचे दिवस? हे कसे शक्य आहे?"
"शक्य आहे! सारे काही शक्य आहे! ही सल्तनत नेस्तनाबूद झाली तर तेही शक्य आहे. ह्या सल्तनतला बरबाद करायचे आहे. तिला नेस्तनाबूद करायचे आहे. तिचे तीन तुकडे करायचे आहेत. तेच आम्ही करतो आहोत!"
"तुम्ही? तू? तुला हे कुणी सांगितलं? ही बगावत आहे माझ्या जिवा! तुला माहीत नाही. काही कळत नाही. ते चिरडून टाकतील! वरवंटा फिरवतील! आपल्या सर्वांचा खातमा करतील!"
बानोने जागची उठून त्याला मिठी मारली!
“ते शक्य नाही. तुला काही माहीत नाही, अम्मी! पूर्वीसारखी ही रझाकारी चळवळ नाही. आपल्यापुरती मर्यादित नाही. असंख्य माणसे यात शरीक झाली आहेत. ह्या वेळेला फार वेगळं घडणार आहे."
"काय आहे?" उबेदुल्लाने विचारले, "आहे तरी काय? काय चाललं आहे? आणि आम्हाला कसं कळलं नाही?"
"कळेल! तुम्हालाही ते लवकर कळेल! गावंच्या गावं स्वतंत्र होतील. सरकारी कारभार सारा संपृष्टात येईल. दिल्ली सल्तनत उलथून पडेल. आपण पूर्वीसारखे आझाद होऊ. पूर्वीसारखं आपल्याला शानमध्ये राहता येईल!"
"खरंच? खरंच असं घडेल?"
“का नाही? घडलं पाहिजे. केवढ्या मोठ्या प्रमाणात सारं चाललं आहे. मग का घडणार नाही?"
उबेदुल्लाचे डोके भणाणून गेले. त्याला काहीच समजेनासे झाले. मुलाचे म्हणणे खरे व्हायला हवे होते. पण तो भीत होता. सरकारचा रोष ओढवून घ्यायची त्याची तयारी नव्हती. स्वत:च्या आणि मुलाच्या जीविताची त्याला चिंता वाटत होती.
हळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मुलाच्या खोलीतले छायाचित्र त्याला आठवले. आसपासच्या गावांहून ऐकू येणाऱ्या बातम्यांनी त्याच्या मनात गर्दी केली. त्याची चर्या गंभीर झाली.
"कम्युनिस्ट लोक?"
खुदा हाफिज । ८५