पान:लाट.pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवली आणि सकाळी कोंडवाड्यात रवाना केली.
 सतत आठ दिवस त्यानं हा उद्योग केला. रात्रीची तो पकडीत होता. रात्रभर डांबून ठेवीत होता आणि सकाळी कोंडवाड्यात पाठवून देत होता. पण नवव्या दिवशी त्याच्या या निरर्थक उद्योगात अकस्मात खंड पडला. खुद्द वडारीच त्याच्याकडे आले.
 ते आले तेव्हा अबदुल्ल्या गाढवं कोंडवाड्यात नेण्याच्याच तयारीला लागला होता. वडाऱ्यांनी येऊन अदबीनं लवून रामराम केला, तेव्हा जरा घुश्श्यातच त्यानं तो स्वीकारला. शेवटी वडाऱ्यांच्यातला एक जण त्याला विनंती करता झाला, "तुमच्याशीच आलो नवं का? आवो? गाढवं कोंडवाड्यात कशापाय धाडतावं? तथं जबर दंड बसतुया गाढवास्नी! तुमीच पकडून का ठेवीत नाय? आमी तुमालाच दंड द्येव!"
 च्च्या! सगळंच मुसळ केरात! या गाढवांपायी अखेरीस आठ दिवस आपण पुरताच गाढवपणा केला असं अबदुल्ल्याला वाटलं. गेली कुठं आपली अक्कल? आपल्याला हे अगोदर कसं सुचलं नाही? मूर्खासारखी, ही चालून आलेली रोजी आपण हातची कशी घालवली? आणि तीही लागोपाठ आठ दिवस! अबदुल्ल्यानं स्वत:ची भरपूर निर्भर्त्सना केली.
 पण अजून चानस गेलेला नव्हता. आज तर गाढवं अजूनही त्याच्या दारातच होती. त्यानं हिशेब केला, निदान गाढवामागं दोन रुपयांप्रमाणं पाच गाढवांचे दहा रुपये यायला काहीच हरकत नाही! अल्लाच्या मेहेरबानीनं ही गाढवं जर अशीच रोज यायला लागली, तर काय मजा होईल? यंदाची आगोठ मजेत जाईल! बिलकूल मजेत जाईल!
 वडारी त्याच्या तोंडाकडे एकटक पाहत होते. पण मनातले विचार चेहऱ्यावर उमटू न देण्यात अबदुल्ल्या वाकबगार होता. गाढवं रात्री-अपरात्री तळात सोडल्याबद्दल आधी तो त्यांच्यावर संतापला आणि तोंडाला आलं ते बरंच काहीतरी बोलून, या सौद्यावर आपण मुळीच खूष नाही असा आविर्भाव चेहऱ्यावर आणून त्यानं दहा रुपये घेतले व गाढवं सोडून दिली. सरकारच्या पन्नास रुपयाऐवजी इथं दहा रुपयांवर भागलं म्हणून वडारी खूष झाले आणि वांग्यांच्या धंद्यात नाही तर नाही, निदान या वडाऱ्यांच्या गाढवांच्या धंद्यात दहा रुपये प्राप्ती झाली म्हणून अबदुल्ल्या खूष झाला. इतकेच नव्हे तर, तो दुसऱ्या रात्रीही मळ्यात बसून गाढवांची अत्यंत उत्सुक मनानं प्रतीक्षा करू लागला. अल्लानं अशीच मेहरबानी केली तर दोन-तीनशेची कमाई व्हायला काहीच हरकत नाही, असं त्याला वाटू लागलं.
 आणि काय आश्चर्य? अल्लाही त्याच्या मदतीला धावला. रोज दोन-तीन गाढवं त्याच्या मळ्यात येऊ लागली. अबदुल्ल्या त्यांना पकडून ठेवू लागला आणि गाढवामागं रोख दोन रुपये घेऊन त्यांना सोडून देऊ लागला. दिवसाकाठी पाच-सहा रुपयांची नगद कमाई होऊ लागली. वांग्यांचा थोडाफार पैसा येत होताच; पण तो आला नाही तरी त्याला आता फिकीर नव्हती. गाढवं पकडता यावीत म्हणून तो धंदा करायचा; यापलीकडे आता वांग्यांच्या धंद्यात काही अर्थ नव्हता.

 पण काही दिवसांनी गाढवांची संख्या घटू लागली. आणि मागाहून तर त्यांनी आपला

६६ । लाट