पान:लाट.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दावतदेखील गावात कुणाला दिली गेली नव्हती.
 मसूदखानच्या तलाकचे आणि नव्या लग्नाचे वृत्त आपल्या घरात भुतासारख्या वावरणाऱ्या मुस्तफाखानपर्यंत कसे तरी जाऊन पोहोचले तेव्हा त्याच्या अंगाचा भडका उडाला. एखाद्या रुळासारखे अजस्र सामर्थ्य असलेला तो माणूस या जगातले हवे ते विकत घ्यायला निघाला आहे असे त्याला वाटू लागले. हा रूळ थांबविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही याची त्याला त्या क्षणी पुन्हा खंत वाटू लागली.
 घरातल्या घरात येरझारा घालीत असताना मसूदखानच्या नरडीचा घोट घेण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला. आपल्या मनात हा विचार यावा याचे त्याला आश्चर्य वाटले. मसूदखानला रोखण्याची, त्याचा अन्याय वेशीवर टांगण्याची आपल्याला इच्छा झाली याचे त्याला नवल वाटू लागले.
 पण तसे झाले खरे! वेड्यासारखा तो विचार त्याच्या मस्तकात घुसला आणि ठाण मांडून बसला. त्या क्षणी मसूदखान गावात हजर असता तर तो नक्कीच त्याच्या नरडीचा घोट घ्यावयास गेला असता! पण त्याच्या दुर्दैवाने मसूदखान मुंबईत मधुचंद्र साजरा करीत होता. आपल्या नव्या बायकोचे सौख्य अनुभवीत होता. मेजवान्या झोडीत होता.
 मुस्तफाखानला त्याच्या या नव्या बायकोबद्दल अनुकंपा वाटू लागली. मसूदखानने आजवर तलाक दिलेल्या साऱ्या बायका त्याच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या तेव्हा या नव्या बायकोचे भवितव्यदेखील वेगळे नाही, हा विचार त्याच्या मनात आला. त्या सोडून दिलेल्या बायकांबद्दल त्याला जशी दया वाटू लागली, तशीच त्याला या नव्या बायकोबद्दलदेखील वाटू लागली. त्या सोडल्या गेल्या म्हणून आणि ही कधी तरी सोडून देण्यासाठी आणली गेली म्हणून! पण या साऱ्या बायका त्याने पाहिल्या होत्या. अगदी मसूदखानने त्यांच्याशी लग्ने करण्याच्या आधीपासून तो त्यांना ओळखत होता. त्यांच्या सुखदु:खांशी, आकांक्षांशी, नवऱ्याबद्दलच्या त्यांच्या किमान सुखाच्या कल्पनांशी तो परिचित झाला होता. पण ही मुंबईची बायको त्याने पाहिली नव्हती आणि जे तिच्याविषयी त्याने ऐकले होते, त्यावरून गावातल्या या सामान्य स्त्रियांहून ती खचित वेगळी असल्याचे अनुमान त्याने काढले होते.
 हैदराबादच्या कुठल्या तरी नबाबाची ती मुलगी असल्याचे त्याने ऐकले होते. ती चांगली शिकलेली, सुसंस्कृत मुलगी आहे असेही त्याला माहीत झाले होते. आणि मसूदखानशी तिचा प्रेमविवाह झाला असल्याचीही अफवा त्याच्यापर्यंत पोहोचली होती. मसूदखानसारख्या दुष्ट मनुष्याला निवडणाऱ्या त्या मुलीबद्दल त्याला करुणा वाटू लागली. अशा मोठ्या घराण्यातल्या चांगल्या मुलीने त्याला कशी माळ घातली हे कोडे विचार करूनदेखील त्याच्याने उलगडेनासे झाले.
 त्याला तिच्याविषयी विलक्षण कुतूहल मात्र निर्माण झाले. तिला बघावेसे त्याला वाट लागले. तिला शक्य तर भेटावे आणि तिचे हृद्गत समजावून घ्यावे असला विचित्र विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला.

 एक दिवस मसूदखान तिला घेऊन गावात आल्याचे कळताच तो विलक्षण अस्वस्थ

पराभूत । ३१