एकदा...एकदा..."
"तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही?"
"काही नाही."
"मग का मला वारंवार बोलावता?"
"तू येऊ नकोस."
"माझ्यानं राहवणार नाही. तुम्ही ते ओळखलं आहे. मी अगदी वेड्यासारखी वागते. अगतिक होऊन जाते. एकटी असले की मला लोनली वाटू लागतं. मी चुकते का हो?"
"मला हे सगळं सोडून द्यावंसं वाटतं. या स्वैर आयुष्याला तिलांजली द्यावीशी वाटते. मी यातून बाहेर पडेन का हो?"
"मी काय सांगू?"
"का? इतक्या दिवसांत तुम्हाला माझ्याविषयी काहीच मत बनवता आलं नाही? की तुम्हाला खरं सांगायचं नाही?"
"असं हे किती दिवस चालणार? किती दिवस आपण एकमेकांना अशी भेटत राहणार? हे बरं नाही. खरंच, बरं नाही. मला येऊ नयेसं वाटतं. पण...मी काय करू मला कळत नाही!"
"तुमचं माझ्यावर प्रेम नाही?"
"नाही."
"कशाला मग मला तुम्ही जवळ घेता?"
"तुला अनेक लोक जवळ घेतात."
"पण तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते त्यांच्याबद्दल वाटत नाही. मी तुमच्याकडे अधिक आकर्षित झाले आहे."
"कारण त्यांच्यापेक्षा मी तुझ्या अधिक सहवासात असतो. रात्र रात्र आपण एकमेकांच्या मिठीत पडलेलो असतो."
"मला लग्न करावंसं वाटतं. कुणाशी तरी संसार करावासा वाटतो. पण माझे चारित्र्य आड येतं. त्यामुळे कुठंच जमत नाही. माझं काय होईल हो? हल्ली मला बाहेर पडायचीसुद्धा शरम वाटते. लोक काय हवं ते बोलत असतात. त्यामुळे मी घरातच राहते. आईबाबांच्या ते लक्षात आलं आहे. परवा बाबा आईशी बोलत होते : 'आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. आपल्या गरजा भागत होत्या म्हणून काही बोललो नाही-'"
"त्यांना आपला संशय आला आहे?"
"नाही. मी त्यांना पैसे देत असे. मला अनेकांकडून मिळालेले. ते लाचारीने मागत आणि मी सरळ काढून देई. तुमच्याविषयी त्यांना तसा संशय नाही. आपल्या दारिद्र्याची झळ तुम्हाला लागू नये असे त्यांना वाटते. तुमच्याविषयी त्यांचं मत फार चांगलं आहे."
एक दिवस तिला यायला फार उशीर झाला. किती तरी वेळ झाला. ती आलीच नाही.
कळ । १९