अखेर ती एकदाची मृत्यू पावली.
तिचा महिना झाल्यावर त्याने पुन्हा सगळे सोपस्कार करायला लावले-घर सारवण्याचे आणि स्वच्छ करण्याचे. बापाने अवाक्षर न काढता या वेळी आपली गादी आपणहून उचलली.
पण ते करूनही या वेळी त्याचे मन पूर्वीसारखे शांत झाले नाही. संशयाचा, भीतीचा अंश त्याच्या मनात शिल्लक राहिला आणि त्याला पोखरू लागला. क्षयाने दोन माणसे घरातून नेली. आता तिसरे तर नेणार नाही? क्षय घरात कायमचाच ठाण तर मांडणार नाही?
त्याची शंका थोड्याच महिन्यांत खरी ठरली. अबासखान आता क्षयाचे भक्ष्य बनला! एकाएकी म्हातारा रक्त ओकू लागला. झपाट्याने मरणाच्या पंथास लागला.
या वेळी क्षयाने त्याला विचार करायलाही विशेष अवधी दिला नाही. एखाद्या घोडेस्वारासारखा घोडदौड करीत तो आला आणि फरपटत ओढून घेऊन गेला. पंधरा दिवसांत सगळा खेळ खतम झाला. या पंधरा दिवसांत दिङ्मूढ अवस्थेत तो घरात (खरे म्हणजे घराबाहेर) वावरत होता.
अबासखान मेल्यावर त्याची लळी पडलेली विचारशक्ती जागृत झाली. क्षयाचा एकच विचार त्याच्या डोक्यात धुमाकूळ घालू लागला. स्वत: काळजीपूर्वक राहण्याचे, घरात वावरण्याचे त्याने ठरवले. घरात झोपण्याचे त्याने प्रथम सोडून दिले आणि तो छपरात झोपू लागला. मग सगळे घर त्याने यावेळी फिनेलने धुऊन घेतले. अगदी स्वच्छ केले. घराची काही कौले उसवली आणि आत प्रकाश खेळू दिला.
पण इतके करून त्याचे समाधान झाले नाही. त्याच्या मनातली धास्ती कमी झाली नाही. एकदा छपरात खाटेवर पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात एकदम एक विचार आला आणि तो धावत घरात आईजवळ गेला.
ती वठणातल्या काळोखात बसली होती.
"ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला आहे." तो म्हणाला.
नवरा मेल्यापासून पांढरे नेसून ती वठणात बसत होती आणि जायलाच हवे म्हणून चुलीशी जात होती. बोलायचे तर तिने जवळ जवळ सोडूनच दिले होते. (बोलणार तरी कुणाशी?)
"घराचं छप्पर मोडलं पाहिजे." उभ्या उभ्या तिच्या दिशेने पाहत तो म्हणाला.
"छप्पर मोडलं पाहिजे? का?" काळोखातून तिचा आवाज त्याला ऐकू आला.
"घरात काळोख येतो म्हणून!"
"तुला वेड तर नाही लागलं? अरे, काळोख येतो म्हणून वाडवडिलांनी बांधलेलं छप्पर मोडायचं?"
"मग काय झालं? ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला आहे! त्यासाठी काय आता घरातल्या उरलेल्या माणसांनी मरायचं?"
"मरायला आता राहिलंय रे कोण? गेली सगळी! गेली!" ती रडू लागली.
परंतु करीम या वेळी निश्चयाने म्हणाला, "गेली ती गेली. तुला आणि मला जगायचं आहे
छप्पर । ५