करीम दरवाजातूनच परत फिरला.
त्या दिवशी त्याने सगळे घर डोक्यावर घेतले. आईला तो म्हणाला, “साली सगळी जंगली माणसं आहात तुम्ही!"
"होय बाबा, आम्ही जंगलीच आहोत. आमचे दिवस गेले ना पण?" तिला एकंदरीत अधिक बोलायची इच्छा नव्हती. मुलीच्या आजाराने आणि मृत्यूच्या जाणीवेने ती भेदरून गेली होती.
पण तो तेवढ्यावरच गप्प बसला नाही. "गेले कसले?" तो उसळून म्हणाला, "तुझे एक गेले; पण ह्या पोरीचे जायचे आहेत की नाही?"
"हो रे बाबा. बस कर आता! हे मला गुपचूप का बोलला नाहीस? आत तिच्या समक्ष कशाला तमाशा केलास? तिची तबियत जास्तीच बिघडली आहे आता, समजलास?"
आणि हा वाद थांबवून ती जवळजवळ डोळे पुशीत आजारी मुलीच्या खोलीत गेली.
जवळ जवळ महिनाभराने बहीण मृत्यू पावली. ती मरेपर्यंत तो पुन्हा म्हणून तिच्या खोलीत गेला नाही. तिचा महिना झाला आणि घर पूर्ववत शांत झाले. अबासखान छपरात सकाळसंध्याकाळ बसू लागला. आई चुलीशी लुडबूड करू लागली आणि धाकटी बहीण, बहिणीचे मागे राहिलेले मूल सांभाळू लागली.
आणि त्याने एक दिवस सारे घर शेणाने सारवायला सांगितले. घरातल्या गोष्टीत अबासखान लक्ष घालीत नसे. या वेळी जेव्हा त्याला छपरातले बिस्तर हलवावे लागले, तेव्हा त्याने मुलास विचारले, "तू या नसत्या गोष्टीत कशाला लक्ष घालतोस? काही उद्योगधंदा बघ. शेतावर जात जा!"
मुलाला शेतावरच पाठवायचा होता तर त्याला चार वर्षे शिकवला कशाला याचा विचार अबासखानाने कधी केला नाही आणि करीमनेही आपल्या डोक्यात कधी आणला नाही. शेतावर जायचा त्याला नेहमीच कंटाळा असे. बापाला काही उत्तर न देता तो मनातल्या मनात चिडला.
"आपण घरात जास्ती लक्ष देऊ नये." अबासखान पुन्हा म्हणाला, "आपल्या संसारात लक्ष द्यावं."
त्याने ऐकले न ऐकल्यासारखे केले आणि तिथून तो बाजूला झाला. घर सारवण्याचा कार्यक्रम मात्र पार पडला. तो आपल्या मनात बापाच्या बोलण्याचा विचार करीत राहिला.
असे चारसहा महिने गेले आणि त्याची धाकटी बहीण एक दिवस रक्त ओकली. चांगली तस्तभर रक्त ओकली. तिने अंथरूण धरले. त्याच्या आईबापांच्या तोंडचे पाणी पळाले. एकाएकी पोरीला झाले तरी काय?
तो मात्र भीतीने भेदरून गेला. पुन्हा त्याच्या मनात भीती आणि संशय ठाण मांडून बसली. मृत बहिणीचा कृश देह त्याला डोळ्यांसमोर दिसू लागला आणि तिची उष्टी पेज पिणारी धडधाकट धाकटी बहीण...
पहिल्यासारखाच डॉक्टर आला आणि त्याने क्षयाचे निदान केले. ऐन तारुण्यातच तिला
छप्पर ।३