पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दृष्टीने. त्यांच्या दृष्टीने ती अडचण महत्त्वाचीच असते. उदा. - एखाद्या वेळी एखाद्या मुलाला कित्येक तास समजावून सांगूनही समजून घ्यायचेच नसते अशा वेळी काय करायचे हेच समजत नाही. एखाद्या वेळी कित्येक मैल चालत शाळेत पोहोचल्यावर सगळी मुले ऊसाच्या फडावर गेलीत, शाळेत कुणीच नाही हे पाहून हताश व्हायला होते. कित्येकदा पालक संपर्काला गेल्यानंतर पालक दारू पिऊन आलेले असतात आणि रात्री कितीही समजावून सांगितले तरी पहाटे मुलांना कामाला घेऊन गेलेले असतात. शिवाय कित्येकदा प्रबोधकांचे वय लहान असल्याने पालक त्यांच्या बोलण्याला फारशी किंमतही देत नाहीत. पण एकूण उपक्रमाचे महत्त्व, देशप्रश्न म्हणून त्याचे स्थान, आपले त्यातील स्थान याची जाणीव प्रबोधकांशी वारंवार औपचारिक- अनौपचारिक बोलून करून द्यावी लागते. त्यांच्या चुका हळुवारपणे समजून घेणे, त्यात बदल सुचवताना मार्गदर्शक ह्या त्यांच्या भूमिकेला कुठेही धक्का न लावता त्यांना काही सुचविणे, त्यांच्या चांगल्या कल्पनांना योग्य वेळी दाद देणे - शाबासकीची, कौतुकाची थाप देणे असेही करावे लागते.
 अर्थात पुष्कळदा 'नव्याचे नऊ दिवस' असाही प्रकार आपल्याला अनुभवायला मिळत असतो. पण हा अनुभव जिवंत राहण्यासाठी त्यांच्यामधील संवेदनाशीलता आपणच जागी ठेवणे आवश्यक असते. डोळे उघडे ठेवून जगात वावरणे हे आपणच मुलांना शिकवावे लागते. प्रत्येक ठिकाणी ऊसतोडणी कामगारांची मुले व त्यांच्यासाठीचा साखरशाळेसारखाच उपक्रम असेल असे नाही. परिसरातील प्राथमिक शाळा, रिमांड होम, अनाथालय, बालकामगार, वीट भट्ट्या, रेल्वे स्टेशनवरील मुले, बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची मुले यांच्यासाठीही काम करणे शक्य आहे. जे शिक्षणातून म्हणजे नेहमीच्या औपचारिक शिक्षणातून मिळत नाही अशा गोष्टींची जोड देता येणे शक्य असते. आपल्या विद्यार्थ्यांमधील अनेक गुणांची जाणीवही यामुळे आपल्याला होऊ शकते. या संदर्भातले एक-दोन अनुभव मला आठवतात की, जे या कामात सतत उत्साह तर देत राहतातच, शिवाय प्रबोधक नुसते जाऊन येतात व विसरतात असे होत नाही.
 १९९३-९४ चे साखरशाळेचे पहिले वर्ष. प्रबोधिनीतील इयत्ता आठवीतील चार विद्यार्थ्यांचा गट साखरशाळेत गेला होता. संध्याकाळी दलानंतर सर्वजण बाहेर बसले होते. बाजूलाच मुकादम कामगारांना पैसे वाटप करीत होता. कमी पैसे हातावर ठेवून जास्त पैशांवर सही घेणे चालू होते. एका विद्यार्थ्याने पुढे जाऊन ताबडतोब त्याला विरोध केला. मुकादमाने परिस्थिती लक्षात घेऊन पैसे व्यवस्थित द्यायला सुरुवात

रूप पालटू शिक्षणाचे(५९)