पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकाशकाचे दोन शब्द

 ‘मनुष्यघडणीसाठी शिक्षण' ही स्वामी विवेकानंदांची मध्यवर्ती कल्पना आजच्या काळात प्रत्यक्षात उतरविण्याचा ज्ञान प्रबोधिनी प्रयत्न करीत असते. औपचारिक शिक्षणासाठी उभ्या केलेल्या शाळांना कशाकशाची जोड दिली पाहिजे; अध्यापक, पालक आणि समाज यांनी शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कोणत्या भूमिका बजावण्याची गरज आहे याचा उहापेह करणारे व त्यातील नमुना उपक्रमांची रूपरेषा समोर मांडणारे हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे.
 राष्ट्र घडणीची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात जागवायची असेल, तर शिक्षण प्रक्रियेत व आशयात कोणते परिवर्तन झाले पाहिजे, याविषयी प्रबोधिनीची भूमिका स्पष्ट करणारे विस्तृत विवेचन प्रबोधिनीचे संचालक वाचस्पती मा. गिरीशराव बापट यांनी पुस्तकाच्या प्रारंभी केले आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकास म्हणजे काय, तो कसा करता येईल, त्याचे पर्यवसान प्रेरणासंपन्न, राष्ट्राभिमुख व समृद्ध व्यक्तिमत्त्वात कसे होऊ शकेल, याची मांडणी प्रबोधिनीच्या गेल्या ३० वर्षांच्या अनुभवांच्या आधारे यात केली आहे.
 ही शैक्षणिक प्रक्रिया अनेक शाळांनी अनुसरली पाहिजे, असा प्रबोधिनीचा आग्रह असतो. त्यासाठी विविध संस्थाचालक, मुख्याध्यापक, अध्यापक व विद्यार्थी यांची प्रशिक्षण शिबिरे प्रबोधिनीच्या केंद्रांवर चालू असतात. त्या शैक्षणिक पर्यावरणात, शासकीय व्यवस्थेला अथवा स्पर्शोन्मुख समाजाला नावे ठेवण्यात वेळ दवडण्यापेक्षा वेगळे काही प्रत्यक्ष करून कसे दाखविता येईल, याबद्दल नेमकी रूपरेषा या पुस्तकात मांडली आहे. सुमारे ५ वर्षांत ही प्रक्रिया टप्याटप्याने आपापल्या शाळांमध्ये कशी आत्मसात करता येईल, याचे दिग्दर्शन एका आराखड्याद्वारे केले आहे. पाच पायऱ्यांमधील एकेक नमुन्याचा उपक्रम निवडून त्याची कार्यवाही कशी करावयाची, याचे तपशीलवार विवेचन उत्तरार्धात केले आहे. या उपक्रमांना अन्यत्र आवृत्ती करता येईल इतक्या दर्जापर्यंत नेऊन ठेवण्यास आजवरच्या अनेक अध्यापकांनी वेळोवेळी योगदान केले आहे. त्यातील काहींनी आपल्या अनुभवाद्वारे हे चिंतन या पुस्तकासाठी लेखबद्ध केले आहे. या सर्वांना प्रबोधिनीच्या वतीने धन्यवाद !
 ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै.वि.वि. तथा आप्पासाहेब पेंडसे यांच्या सतराव्या स्मृतिदिनी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व वर्धिष्णू कार्यरचनेचे हे एक पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वास वाटतो.



राष्ट्रीय सौर २८ श्रावण, शके १९२२

  

वि.शं. सुभाष देशपांडे

१९ ऑगस्ट २०००,

  

कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी





(४) रूप पालटू शिक्षणाचे