पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांना भेटणे सहज शक्य होते. प्राचार्य, खातेप्रमुख, मार्गदर्शक अध्यापक यांच्यात कार्यवाहीसंबंधात बैठकीची योजना असते.
परीक्षा आणि मूल्यमापन
 प्रत्येक विषयाची परीक्षा वेगवेगळ्या वेळी घेतली जाते. विषयांनुसार मूल्यमापनाचे निकष निश्चित करून अंतर्गत व बाह्य परीक्षण केले जाते. बाह्य परीक्षकही काही वेळा नियुक्त केले जातात. प्रत्येक विषयासाठी परीक्षा पद्धत व गुणविभाजनासाठी निकष लावले जातात व त्यानुसार त्या विषयाचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक विषयासाठी २५ पैकी गुण दिले जातात. पाठांतर, वक्तृत्व, वृत्तपत्र कात्रण संग्रह, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे या विषयांची प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.
निरीक्षण
 शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच्या शालेय पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त वरील सर्व गोष्टींसाठी जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते असे काहींना वाटणे स्वाभाविक आहे. पण आजपर्यंतचा अनुभव/निरीक्षण असे आहे की शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६०% विद्यार्थी त्या-त्या वेळी वर्गात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये होते. वर्गात नेहमी मागे राहणारी मुलेसुद्धा प्रार्थनेनंतरच्या वक्तृत्वाच्या वेळी सर्वांवर छाप पाडणारे भाषण करतात. शास्त्र विषयात कमी गुण मिळविणारे विद्यार्थीसुद्धा उत्तम उपकरण तयार करतात. इ. सातवीच्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा वेग वाढलेला आढळतो. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याची गोडी त्यांना लागते. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांना पाठांतर, लेखन, कात्रणं चिकटविणे इ. पेक्षा प्रत्यक्ष हाताने कृती करण्यात जास्त रस वाटतो. उदा. अन्य कौशल्यांमध्ये इ. सातवीची मुले एखाद्या गृहिणीलाही लाजवतील अशा रीतीने भात, पिठले, रस्सा, साबुदाण्याची खिचडी, एखादी उसळ उत्तम रीतीने करतात. केलेला पदार्थ उत्तम रीतीने सजवितात व स्वयंपाकघरातील स्वच्छता पण करतात.
निष्कर्ष
 इयत्ती सातवी शिष्यवृत्तीच्या निमित्ताने शिकलेल्या विविध विषयांचा व कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चितपणे होतो. वाचन, लेखन, पाठांतर इ. मूलभूत अध्ययन कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत व अन्य स्पर्धांतून होतो. वक्तृत्व व मुलाखत घेणे यांमुळे विद्यार्थ्यांचे मौखिक कौशल्य वाढीस लागते व त्यांच्यामध्ये सभाधीटपणा येण्यास मदत होते.



(३८) रूप पालटू शिक्षणाचे