पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारणपणे आठ महिन्यांचा कालावधी दिला जातो. सर्व कौशल्यांच्या अंतर्गत असलेल्या विविध विषयांचे वर्षभर वेगवेगळ्या वेळी परीक्षण करण्यात येते. वर्षाच्या शेवटी संकलित निर्णयावरून ५ विद्यार्थी व ५ विद्यार्थिनी अशा दहा जणांना इयत्ता दहावी पर्यंत रु.१५/
 प्रतिमास इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याशिवाय प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस दिले जाते. दर वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्राद्वारे ह्या योजनेची माहिती दिली जाते. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची सोय प्रशालेत केली जाते. या योजनेत सहभागी होणे सक्तीचे नाही. तथापि एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे ७५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसतात. सर्वसाधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या विषयांची कल्पना, त्या विषयांचा आवाका, विषयांचा अभ्यासक्रम, मूल्यमापनाचे निकष, परीक्षांच्या तारखा इ. गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातील सर्व शंकांचे निरसन केले जाते व प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्यापासून मार्गदर्शनाला सुरुवात होते.
मार्गदर्शन
 शैक्षणिक वर्षातील ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती योजनेसाठी खातेप्रमुख व अंतर्भूत विषयांसाठी मार्गदर्शक नियुक्त केले जातात. इयत्ता सातवीला विषय अध्यापन करणाऱ्या अध्यापकांकडेच संबंधित अध्ययन कौशल्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली जाते. गतिवाचन, वृत्तपत्र कात्रण संग्रह, मुलाखत तंत्र,वक्तृत्व इ. विषयांच्या मार्गदर्शनाची जबाबदारी प्रशिक्षित शिक्षकांकडे दिली जाते.
 इयत्ता सातवीच्या वेळापत्रकात शिष्यवृत्तीसाठी आठवड्याला एक तास राखून ठेवलेला असतो. विद्यार्थ्यांवर अधिक तासिकांचे ओझे नसावे या हेतूने व बहुतेक विषयांना प्रशालेतील अध्यापक मार्गदर्शन करीत असल्यामुळे शिष्यवृत्तीसाठी शाळेआधी किंवा शाळा सुटल्यानंतर जास्तीचे तास घ्यावे लागत नाहीत.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे इ. विषयात स्व-अध्ययनाचा भाग अधिक असल्यामुळे या विषयांना नियमित तासिकांची आवश्यकता भासत नाही. इयत्ता सातवीला अध्यापन करीत नसलेल्या मार्गदर्शकांसाठी आठवड्यातील राखीव तासाचा उपयोग केला जातो. नियोजित तासिकांनंतरही विद्यार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास विद्यार्थी मार्गदर्शकांकडे मदतीसाठी जाऊ शकतात. मार्गदर्शक प्रशालेतीलच असल्यामुळे


रूप पालटू शिक्षणाचे(३७)