पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा भाकडकथा जीनांचे समर्थक पसरवीत असतात. जीना धर्मवेडे नव्हते-हिंदुद्वेष्टे तर नव्हतेच नव्हते-त्यांना फक्त मुसलमानांचे वेगळे राष्ट्र हवे होते. ते मिळविण्यासाठी त्यांनी दंगलींच्या साधनाचा वापर केला असेल, परंतु पाकिस्तानचे ध्येय साध्य होताच त्यांनी दंगलींच्या साधनाचा वापर करणे सोडून दिले आणि पाकिस्तानातील हिंदूंचा बचाव करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तान साध्य करण्यासाठी त्यांनी ज्या धर्मवादी शक्तींना उत्तेजन दिले त्यांच्यावर त्यांना मागाहून नियंत्रण ठेवता आले नाही, असे थोडक्यात जीनांचे एक चित्र ही मंडळी रंगवीत असतात. जीनांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी दंगलींना उत्तेजन दिले असे म्हणून जीना जातीयवादी असल्याची कबुली या मंडळींच्या समर्थनातूनच दिसते. परंतु ही भूमिका आपण मान्य केली तरी काही प्रश्न उपस्थित होतातच. जीनांनी दंगलीबाबत 'मुसलमानांना दोष देण्याचे का टाळले? यामुळे दंगली अधिक होत राहतील हे त्यांना कळले नाही असे समजावयाचे काय? सिंधी हिंदूंना भारताने बोलावले या असत्याचा उच्चार का केला? यामुळे दंगली घडवून आणून अल्पसंख्यांकांना घालवून देण्याची प्रवृत्ती मुसलमानांत वाढेल हे त्यांना कळत नव्हते असे समजावयाचे काय? कुठेही दंगलग्रस्त विभागाला भेट देऊन त्यांनी हिंदूं-शीखांना दिलासा देण्याचा प्रयत्न का केला नाही? (श्रीप्रकाश हे आपल्या 'Pakistan : Birth and Early Days' मीनाक्षी प्रकाशन, मीरत, १९६५, या पुस्तकात वेगळीच माहिती पुरवितात. सिंधी हिंदू भारताकडे येण्यासाठी निघाले तेव्हा भारतीय हायकमिशनच्या कचेरीने कराचीत त्यांच्याकरिता तात्पुरता स्थलांतरित (transit) कॅम्प उघडला होता. हा कॅम्प गव्हर्नर जनरलच्या बंगल्यापासून सुमारे तीन मैल अंतरावर होता. परंतु एक दिवस अचानक तीन मैल अंतरावर असलेल्या या कॅम्पचा जीनांना त्रास होतो असे सांगून त्यांच्या ए.डी.सी. ने तो कॅम्प तेथून हलवायला लावला. "This was his love for minorities" असे उद्गार श्रीप्रकाशांनी ही माहिती देऊन पुढे काढले आहेत)त्यांचे धर्मवाद्यांपुढे - काही चालले नाही या म्हणण्यातही काही अर्थ नाही. धर्मवाद्यांपुढे गांधी नेहरूंचेही काही चालले नसते. परंतु त्यांनी धर्मवाद्यांचे काही चालवून घ्यायचे नाही असे ठरविले होते. आणि म्हणून येथे एकाही मुसलमानाला मान खाली घालून वावरावे लागेल अशी परिस्थिती राहता क़ामा नये असे गांधीजी सारखे प्रतिपादन करीत होते. ते फक्त हे म्हणून थांबले नाहीत. ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. जीनांना खरोखर अल्पसंख्यांकांना मुसलमानांनी हाकलून लावू नये असे वाटत होते. तर त्यांनी तसे दृश्य प्रयत्न केल्याचे दिसायला हवे होते. मुस्लिम जनमतावर त्यांचा तेव्हा विलक्षण प्रभाव होता. "हिंदूंना जोपर्यंत मुसलमान सन्मानाने वागवीत नाहीत तोपर्यंत मी पाकिस्तानचे नेतृत्व करणार नाही" असे म्हणून गव्हर्नर जनरलच्या पदाच्या राजीनाम्याची धमकी जरी त्यांनी दिली असती तरी दंगली खाडकन् बंद झाल्या असत्या. एक तर त्यांना घडणाऱ्या घटना रोखायच्या नव्हत्या किंवा रोखायची इच्छाशक्ती त्यांच्यापाशी उरली नव्हती. काँग्रेसविरोधाने आणि गांधीविरोधाने त्यांना असे पछाडले होते की आता फाळणीनंतर हिंदू-मुस्लिम संबंधांना एक संपूर्ण नवे वळण देण्याची आवश्यकता आहे आणि या बाबतीत आपण पुढाकार घेतला पाहिजे, नाहीतर दोन्ही देशांच्या संबंधांना वाईट वळण लागेल आणि दोन्ही देशांतील अल्पसंख्यांकांचे

भारत - पाक संबंध/८९