पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



या पुस्तकात सुशीला नायर भावलपूर संस्थानात हिंदूंनी 'स्थलांतर करू नये' म्हणून सांगण्यासाठी गेल्या होत्या असा सविस्तर उल्लेख आहे. पाकिस्तानातील हिंदूंना बोलावण्यात भारत सरकारचा हेतू तरी काय असावा? पाकिस्तानी व भारतीय मुसलमानांच्या मते सिंधी हिंदूंना बोलावून पाकिस्तानी अर्थव्यवस्था मोडकळीला आणणे हा भारत सरकारचा हेतू होता. पाकिस्तान मोडावयाचे ठरविल्यास भारतातून मुसलमान पाठविले असते तर मोडले असते-आताही मोडता येईल. तसे न करता भारतीय मुस्लिम समाजाला संरक्षण देण्यासाठी गांधी-नेहरू धडपडत होते असे दृश्य दिसते. पाकिस्तानी आणि भारतीय मुसलमानांचे प्रवक्ते थोडे जरी . प्रामाणिक असते तरी त्यांनी अशी असत्य विधाने केली नसती. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या जातीयवादी भूमिकेचे समर्थन करावयाचे म्हटल्यानंतर प्रामाणिकपणा बाळगण्याचा प्रश्नच उरत नाही आणि प्रामाणिकपणा हा मुस्लिम राजकारणाचा खास गुण बनलेला नाही.) जीनांनी कुठेही मुसलमानांना दंगली केल्याबद्दल दोष दिलेला नाही. त्यांनी फक्त 'शांतता पाळा' अशी आवाहने केली आहेत. ज्या आग्रहाने गांधी आणि नेहरू हिंदूंना दंगलींपासून परावृत्त करीत होते तो आग्रह जीनांच्या वक्तव्यात आणि कृतीत कधीही प्रकट झाला नाही. पंजाबमध्ये दंगली उसळल्यानंतर त्यांनी केलेले शांततेचे आवाहन अल्पसंख्यांकांना येथे समानतेने राहण्याचा अधिकार आहे या भूमिकेवरून केले नाही. २५ ऑगस्टला केलेल्या भाषणात त्यांनी 'जे पाकिस्तान आपण लेखणीने मिळविले ते दंगलीने घालवू नका' असे म्हटले आहे. दंगलींनी पाकिस्तान नष्ट होईल ही त्यांची भीती होती. ते नष्ट होणार नसेल तर दंगली झाल्या तरी हरकत नाही, अशी ही भूमिका आहे. ही भूमिका मानवी मूल्यांची कदर करणाऱ्या व्यक्तींची नव्हे, निष्ठर व्यवहारवादी राजकारण्याची आहे. याच भाषणात त्यांनी म्हटले आहे - “मुसलमानांनी दुःख विसरून (पूर्व पंजाबमधील मुस्लिमविरोधी दंगलींचे) पाकिस्तान उभारण्याच्या कामी लागावे. त्यायोगे जगातील सर्वात मोठे इस्लामिक राज्य ते उभे करतील." जीनांनी ११ ऑगस्ट रोजी पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य असल्याची घोषणा केली आहे आणि २५ ऑगस्ट रोजी ते मुसलमानांना इस्लामिक राज्यासाठी शांतता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. आणि तरीही जीनांना धर्मनिरपेक्ष राज्य अपेक्षित होते असे भारतातील त्यांच्या समर्थकांचे आणि चाहत्यांचे म्हणणे आहे.

 फाळणीनंतर दोन्ही देशांत दंगे उसळले. बंगालमध्ये सुदैवाने तेव्हा फारसे दंगे झाले नाहीत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना तेथील अल्पसंख्यांकांची सरळ हकालपट्टी करावयाची होती असाही याचा अर्थ होऊ शकतो. पण त्यांना बहुधा सरळ हकालपट्टी करावयाची नव्हती; अल्पसंख्यांक राहिले तर राहू द्यायला त्यांची हरकत नव्हती आणि गेले तरी त्याचे त्यांना काही सोयरसुतक नव्हते. हिंदू स्वत:हून गेले तरीही त्यांचे काही बिघडत नव्हते. मुसलमानांनी दंगली करून त्यांना घालविले तर त्या दंगली मोडून काढून अल्पसंख्यांकांना सुरक्षितपणे राहण्यासाठी वातावरण निर्मिण्याची आपल्यावर काही जबाबदारी आहे असेही जीना, लियाकतअली खान यांना वाटत नव्हते. कराचीमध्ये दंगली सुरू होताच जीनांनी लष्कराला दंगलखोरांवर गोळ्या घालण्याचे हुकूम दिले. परंतु मुसलमान जमावावर गोळ्या घालावयास मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी विरोध दर्शविला आणि म्हणून जीनांचा नाईलाज झाला,

८८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान