पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फाळणीमुळे त्यांचा मुस्लिमद्वेष कमी झाला असता असे मानण्याइतके जीना खासच दुधखुळे नव्हते. परिणाम असा झाला की पाकिस्तानातून हिंदूना हाकलून तरी दिले जात आहे किंवा जबरीने धर्मांतरित करण्यात येत आहे आणि भारतातसुद्धा लोकांना वाटते त्याहून अधिक जातीय दंगली होत आहेत. पाकिस्तानात हिंदू ओलीस आणि भारतात मुसलमान ओलीस या ओलीस कल्पनेला दोन्ही बळी पडले असतील याची कल्पनाच करवत नाही.) अयूबखान यांच्या Friends not Masters ह्या पुस्तकात पाकिस्तानी अल्पसंख्यांकाचा साधा उल्लेखही नाही. अझिज अहमद आणि खलिद बिन सईद या पाकिस्तानच्या दोन उदरमतवादी लेखकांच्या पुस्तकांतदेखील पाकिस्तानी अल्पसंख्यांकांच्या स्थानांबाबत कोणतेही विवेचन आढळत नाही.
 ही काही उदाहरणे आहेत. मी मुद्दामच त्यात धर्मवादी विचारांच्या लेखकांचा उल्लेख केलेला नाही. मुसलमानांतील धर्मवादी नसलेले मनदेखील आपल्या समाजाखेरीज इतरांचा विचार करण्यास अजून शिकलेले नाही. फाळणीच्या दुष्परिणामांवर लिहिताना तर सर्वच लेखकांनी मुसलमानांचे भले किंवा बुरे काय झाले याचीच चर्चा केली आहे. पाकिस्तानातील मुसलमान लेखकांबाबत मी समजू शकतो. परंतु भारतातील प्रा. मुजिद आणि मौ. आझाद यांच्या लिखाणात फाळणीमुळे उपखंडातील मुसलमान समाजावर होणाऱ्या दूरगामी संभाव्य दुष्परिणामांची चर्चा केली गेली आहे. या संदर्भात हिंदू समाजाच्या विघटनेची साधी दखलदेखील घेण्यात आलेली नाही.

 या मंडळींची इतिहासाबद्दलची दृष्टी ही अशी आहे. मग धर्माबाबत या मंडळींचा दृष्टिकोन काय असेल याचा विचार करणे कठीण नाही. भारतातील आणि इस्लामी जगतातील कोणत्याच मुसलमान विचारवंताने धर्मावर आणि धार्मिक नेत्यांवर टीका करण्याचे धाडस दाखविलेले नाही. येथे पुन्हा एकदा इस्लामी धर्मशास्त्राची बैठक समजून घेणे योग्य होईल. इस्लाम धर्म परिपूर्ण आहे अशी श्रद्धा व्यक्त करूनच मुसलमान सुधारकांनी सामाजिक बदलाचा प्रयत्न केलेला आहे. धर्म आणि धर्मशास्त्र परिपूर्ण आहेत ही भूमिका घेतल्यानंतर फक्त समाज बदलण्याचा प्रश्न उरतो आणि बदलदेखील परिपूर्णतेच्या धार्मिक मर्यादेत करावा लागतो. काही मुसलमानी देशांत मुस्लिम कायद्यात क्रांतिकारक बदल झाल्याचे सांगण्यात येते. या बदलांचे स्वरूप फार मर्यादित आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तुर्कस्तानमध्ये शरियत कायदा संपूर्णपणे डावलला गेला आणि इतर ठिकाणी त्यात क्रमाक्रमाने बदल होत आहेत. हे बदल बंधनात्मक स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ, बहुपत्नीत्वाला आळा घालण्यात आला आहे. या बाबतीत करण्यात आलेला युक्तिवाद असा आहे की इस्लामच्या कायद्यातील सवलती मर्यादित करता येतात. तथापि मुसलमान स्त्रीला बिगर मुसलमानाशी लग्न करण्याचा अधिकार देणारा बदल अजून मुस्लिम कायद्यात कुणी केलेला नाही. कारण त्यामुळे धर्मकायद्यात घातलेल्या मर्यादेचे उल्लंघन होते. (पाकिस्तानसारख्या काही देशांत मुसलमानांना धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तेथे मुसलमान स्त्री धर्मांतर करून बिगरमुसलमानाशी लग्न करू शकेल. मात्र मुसलमान राहून तिला बिगरमुसलमानाशी लग्न करता येणार नाही.) कारण कुराणात या बाबतीत स्पष्ट आदेश आहे आणि त्यानुसार बिगरमुसलमान स्त्रीने किंवा पुरुषाने

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /४३