त्याचबरोबर प्रेषित महंमदाचे आधी अज्ञानयुग होते. इस्लामच्या प्रस्थापनेने ज्ञानाचे युग सुरू झाले. याचाच अर्थ इतिहास सुरू झाला. यामुळेच मुसलमानांच्या दृष्टीने इतिहासाचा आरंभ इस्लामपासून झालेला आहे. मुसलमानांचे इतिहासाचे आकलन त्यांच्या या वेडगळ समजुतीत आहे आणि म्हणून कुठल्याही मुसलमान विचारवंताला आणि इतिहासकाराला इस्लामच्या इतिहासात काही अन्याय्य घडले असे वाटतच नाही. यामुळेच हिंदूंना इतिहास नाही, संस्कृती नाही असे सुशिक्षित मुसलमानदेखील मानत असतात. त्यामुळे क्वचित कोणी मुसलमान विद्वानाने भारताच्या प्राचीन इतिहासात रस घेतल्याचे, त्या इतिहासाचा अभ्यास केल्याचे आढळून येते. मुस्लिम इतिहास कसा वैभवसंपन्न होता, हे सांगण्यात मुस्लिम विद्वानांचे सगळे बुद्धिकौशल्य खर्ची पडत असते.
भारतात हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. भारतातील मुसलमान राजवटीवर भारतीय मुसलमानांनी लिहिलेली पुस्तके वाचली की भारतातील प्रत्येक मुसलमानी राज्यकर्ता गौतम बुद्ध आणि नेहरू या दोघांच्या धर्मसहिष्णु आणि आधुनिक धर्मनिरपेक्ष असा संयुक्त व्यक्तिमत्त्वाचा घडलेला होता असे वाटू लागते! प्रा. महंमद हबीब यांच्यासारखे उदारमतवादी आणि प्रगल्भ वृत्तीचे इतिहासकारदेखील या सापेक्ष ऐतिहासिक दृष्टीपासून अलग झालेले नाहीत. 'पोलिटिकल थिअरी ऑफ दिल्ली सल्तनत्' या आपल्या पुस्तकात प्रा. हबीब यांनी तुर्की राजवट धर्मनिरपेक्ष असल्याचा शोध लावला आहे. त्यांच्या मते व्यक्तीच्या समानतेवर आधारलेली शहरी समाजव्यवस्था तुर्कानी येथे प्रस्थापित केली. प्रा. हबीब यांना अभिप्रेत असलेल्या समानतेचा अर्थ येथे मर्यादित आहे. हिंदु जातिव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी आपले निष्कर्ष बसविले आहेत. परंतु तुर्षांच्या काळात धर्मनिरपेक्ष समानता अस्तित्वात नव्हती. अलीगढ विद्यापीठातील एक प्राध्यापक श्री. निझामी यांनीदेखील तुर्की राजवट धर्मनिरपेक्ष असल्याचा निर्वाळा आपल्या ‘सम् अॅस्पेक्टस ऑफ रिलिजन ॲन्ड पोलिटिक्स इन् १३ न्थ सेंच्युरी' या पुस्तकात दिला आहे. त्यांच्या मते देवळांचा विध्वंस झालेला नाही. त्याचा पुरावा म्हणून ते "तसे असते तर उत्तर भारतात एवढी देवळे कशी उरली असती?' असा प्रश्न विचारतात. उत्तर भारतात एकही देऊळ उरले नसते तरच तुर्की सुलतान अन्याय करीत होते असे निझामींनी मान्य केले असते. बहानी या इतिहासकाराने तुर्की राजवटीच्या हिंदूंच्यावरील अत्याचाराचे नमुने आपल्या लिखाणात दिले आहेत. निझामींना हा पुरावा मान्य नाही. त्यांच्या मते बहानींचा हा कल्पनाविलास आहे. प्रा. इर्फान हबीब (पहा - 'Secular Democracy' मोइस शाकीर यांचे करंदीकरांच्या पुस्तकावरील परीक्षण.) अब्दालीला वलिऊल्लाने लिहिलेल्या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका व्यक्त करतात. हे पत्र वलिऊल्लाचे नव्हे, कुणीतरी धर्मवेड्या उलेमाने मागाहन लिहिले असावे असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या या विधानाला पुरावा देण्याची त्यांच्या ऐतिहासिक दृष्टीला काहीच आवश्यकता वाटलेली नाही, तर भारताचे माजी चीफ प्रोटोकोल-श्री. एम. आर. ए. बेग-(पहा 'Humanist Review' जुलैसप्टेंबर १९६९ चा अंक.) हे “अब्दालीला वलिऊल्लाने बोलाविले तेव्हा राष्ट्रवादाची जाणीव होती काय?" असा अडाणी प्रश्न उपस्थित करतात. खरा प्रश्न वलिऊल्लाचे पत्र खरे की खोटे, किंवा तेव्हा भारतीय राष्ट्रवादाची जाणीव होती की नाही हा नाही. वलिऊल्लाने इस्लामी