पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
.८.


समारोप


 मुस्लिम प्रश्नावरील काँग्रेसच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील भूमिकेची चर्चा आधीच्या चर्चेत आलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील राज्यकर्ता पक्ष या नात्याने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची थोडी चर्चा करणे आवश्यक आहे. काँग्रेसची ही धोरणे प्रामुख्याने नेहरूंनी घालून दिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सतरा वर्षे नेहरूच भारताचे नेतृत्व करीत असल्यामुळे ह्या धोरणांच्या अंमलबजावणीची रीतही त्यांनीच घालून दिली. काश्मीरप्रश्न हा नेहरूंच्या दृष्टीने मुस्लिम प्रश्नाचा एक भाग होता. मुस्लिमांच्या वेगळ्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला प्रभावी आव्हान या दृष्टीनेच नेहरूंनी काश्मीर प्रश्नाकडे पाहिले आहे. त्याचबरोबर भारतातील इतर राज्ये ज्या रीतीने स्वेच्छेने संघराज्यात आली; किंबहुना संघराज्यातील त्यांचे स्थान गृहीतच धरण्यात आले होते तसे काश्मीरबाबत झालेले नाही. काश्मीर वेगळ्या पद्धतीनेच भारतात आले आहे याची जाणीव ते बाळगून होते. भारतातील राष्ट्रवादाची जडण-घडण अजून दुबळी आहे, अनेक जनसमुदायांपर्यंत राष्ट्रीयत्वाची जाणीव पोहोचलेलीदेखील नाही हे ते ओळखून होते. पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर भारतीय मुसलमानांना त्यांच्या अलग निष्ठांतून बाहेर पडता यावे यासाठी पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केले. घटनासमितीत स्वातंत्र्याची घोषणा झाली तेव्हा सरकारतर्फे ते बोलले आणि विरोधी पक्षातर्फे मुस्लिम लीगचे तेव्हाचे अध्यक्ष चौधरी खलिकझ्झमान यांना बोलण्याची त्यांनी विनंती केली. (श्री. खलिकुझ्झमन आपल्या 'Pathway to Pakistan' या पुस्तकात लिहितात, नेहरूंनी एकदा मला घरी जेवायला बोलावले होते. तेथे जुने मुस्लिम मित्र उपस्थित होते. या मित्रांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. म्हणाले, "तुमचे पुढारी पाकिस्तानात मजा करायला निघून गेले आणि इथे