पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

Pakistan', pp.410 - 11.) थोडक्यात, भारतीय मुसलमानांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा विश्वास कमाविण्याऐवजी जीनांचा विश्वास कमाविणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. भारतीय निष्ठेची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानच्या चरणी आपली सेवा रुजू करण्याच्या या सद्गृहस्थांच्या कृत्यामुळे भारतीय मुसलमानांपुढे कोणते आदर्श ठेवले होते याची कल्पना येते. देशनिष्ठेच्या शपथा ह्या देखाव्याकरिता घ्यावयाच्या असतात - आंतरिक निष्ठा वेगळ्या बाळगावयाच्या असतात हे भारतीय मुसलमानांनी चौधरी खलिखुझ्झमान यांच्या या कृत्यापासून ओळखले.
 मुस्लिम लीग त्यानंतर भारतात निष्प्रभ झाली. तथापि तिची ध्येय धोरणे सुरुवातीपासून कोणती होती हे पाहणे उद्बोधक ठरेल. घटनासमितीत वेगळ्या मतदारसंघाचा आग्रह मुस्लिम लीगचे प्रतिनिधी धरत राहिले. घटनेतील समान नागरी विधेयकाच्या मार्गदर्शक तत्त्वाला मुस्लिम लीगच्या तसेच इतर पक्षाच्याही मुस्लिम सभासदांनी कडवा विरोध केला. सरकारी नोकऱ्यांत, संरक्षणदलात मुसलमानांचे राखीव प्रतिनिधित्व असले पाहिजे हाही आग्रह लीगने धरला. लीगची ही भूमिका तिच्या आधीच्या भूमिकेशी सुसंगत होती. नेमक्या शब्दांत सांगायचे तर मुस्लिम लीग पाकिस्तानची मागणी करण्याच्या आधी भारताच्या एकतेसाठी जी किंमत मागत होती ती किंमत आता स्वतंत्र भारतात नागरिक म्हणून राहण्यासाठी आताची लीग मागू लागली. त्याबरोबर मुसलमानांचे प्रतिनिधित्व आपणच करीत आहोत हा दावाही ती सोडायला तयार नव्हती. मुसलमानांचे खरेखुरे प्रतिनिधी विधिमंडळात निवडून जाण्यासाठी वेगळे मतदारसंघ हवे आहेत असे मुस्लिम लीगचे घटनासमितीतील प्रतिनिधी महंमद इस्माईल यांनी प्रतिपादन केले. (पहा - 'Constituent Assembly Debates' - खंड आठवा, पृ. २६९ - ७०.)
 वेगळे मतदारसंघ, मुस्लिम कायदा आणि राष्ट्रभाषा या तीन विषयांवर मुस्लिम लीगने घटनासमितीत जुनी द्विराष्ट्रवादी भूमिका घेतलेली आहे. अर्थात बदलत्या परिस्थितीनुसार लीगला तडजोड करावयाची लबाडीही करावी लागली आहे. उदा. भाषेच्या प्रश्नावर हिंदुस्तानी राष्ट्रभाषा असावी असा ठराव मौ. हफिजुल रहिमान यांनी घटनासमितीत मांडला. या ठरावाला लीगच्या सदस्यांनी एक दुरुस्ती सुचवून पाठिंबा दर्शविला. लीगची भाषेसंबंधीची आधीची भूमिका हिंदुस्तानीला विरोधी होती. आता हिंदुस्तानीला पाठिंबा देण्याचे कारण हिंदीला विरोध करणे हे होते. तडजोडीच्या स्वरूपातील या लबाड भूमिका हे मुस्लिम राजकारणाचे प्रमुख सूत्र बनले आहे.

 घटनासमितीतील प्रयत्न सोडले तर फाळणीनंतर काही काळ तरी मुस्लिम राजकारणाने आक्रमक धोरणाऐवजी बचावात्मक धोरण स्वीकारले होते. लीग मृतप्राय झाली. लीगचे भारतातील सुशिक्षित नेतृत्व पाकिस्तानात निघून गेले. हिंदू प्रतिप्रहाराच्या भीतीने मुस्लिम समाजाची राजकीय आंदोलने बंद झाली. १९४७ ते १९५४, १९५४ ते १९६० आणि १९६० ते १९७० असे मुस्लिम राजकारणाचे तीन टप्पे होते. अनुक्रमे, पराभूत मनोवृत्तीचा निष्क्रिय काळ, मुस्लिम जनमनाला संघटित करण्याचा काळ आणि संघटित जनमत बळकट करण्याचा काळ असे त्यांचे वर्णन करता येईल. भारतीय मुस्लिमांच्या या तीन कालखंडांतल्या

१२६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान