पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मुस्लिम मनाचा हा गोंधळ हैदराबाद संस्थानाच्या बाबतीत दिसून आला. दिल्लीवर असफजाही झेंडा फडकविण्याच्या वल्गना कासिम रझवीने केल्या तेव्हा त्याच्यामागे हैदराबाद राज्यातील सर्वच मुस्लिम जनमत संघटित झाले. हैदराबादचे सैन्य अजिंक्य आहे असे तेव्हा मुसलमानांत बोलले जाई. पुढे ‘पोलिस अॅक्शन' नंतर हैदराबाद राज्यात मुसलमानांच्या कत्तली झाल्याचा आक्रोश भारतातील मुसलमानांनी सुरू केला. दुबळ्या मुसलमानांवर अनन्वित अत्याचार होत आहेत असे सांगण्यात येऊ लागले. एकाच वेळी मुसलमान अजिंक्यही असतो व दुबळाही असतो असे मानण्याच्या मुस्लिम प्रवृत्तीचे हे एक उदाहरण आहे. हैदराबाद राज्यात पोलिस अॅक्शननंतर मुसलमानांवर अत्याचार झाले नाहीत असे मात्र नव्हे. अनेक ठिकाणी रझाकारांनी आधी केलेल्या अत्याचारांचा सूड उगविला गेला. पूर्वीच्या या रझाकारी अत्याचारांबद्दल मुस्लिम वृत्तपत्रे, मुस्लिम नेते आणि संघटना यांनी निषेधाचा आवाज जराही उठविला नाही. हीच पत्रे आणि नेते पोलिस अॅक्शननंतर सूडाच्या भावनेने हिंदूंच्या हातून झालेल्या कृत्याची अतिरंजित वर्णने सांगू लागले. हैदराबाद राज्यातील मुस्लिम अल्पसंख्यांकांनी तेथील बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार हैदराबाद राज्याच्या भवितव्याबद्दल आपला निर्णय घ्यावा अशी भूमिका भारतातील मुस्लिम पत्रांनी, संघटनांनी व नेत्यांनी व्यक्त केलेली नाही. हैदराबाद राज्यातील मुसलमानांपुढेदेखील हिंदू-मुस्लिम संबंधांना वळण देण्याची एक सुसंधी तेव्हा उभी राहिली होती. हैदराबाद राज्यातील बहुसंख्यांकाच्या इच्छेनुसार आपले भवितव्य ठरावे अशी भूमिका त्यांनी घेतली असती तर जातीय वातावरण निवळण्यास फार मदत झाली असती.
 हैदराबाद राज्यात सैन्य पाठवून ते ताब्यात घेतले गेले, जुनागड संस्थानही पुन्हा भारतात आले आणि काश्मीरमध्ये लढाई चालू राहिली. या काळात भारतीय मुस्लिम जनमताच्या प्रतिक्रिया हिंदू-मुस्लिम संबंधांचे तुटलेले दुवे जोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या खचित नव्हत्या. नेहमी दोन पातळ्यांवर मुस्लिम जनमत कसे व्यक्त होते याची मी येथे चर्चा करणार आहे. राजकीय पातळीवर, राजकीय संघटनांच्या स्वरूपात मुस्लिम जनमताची गेल्या पंचवीस वर्षांत एक प्रतिक्रिया राहिली आहे. या मुस्लिम राजकारणाच्या संदर्भात आणि मुस्लिम समाजाच्या मानसिक प्रतिक्रियातून व्यक्त होणाऱ्या त्याच्या इच्छाआकांक्षा यांच्या स्वरुपात मुस्लिम जनमताची दिशा येथे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 आधी मुस्लिम राजकारणाचा विचार करणे उपयुक्त ठरेल. देशाच्या फाळणीबरोबर मुस्लिम लीगचीही फाळणी झाली भारतातील मुस्लिम लीगचे चौधरी खलिखुझ्झमान हे अध्यक्ष बनले. या सद्गृहस्थांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय घटनासमितीत देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यानंतर चौथ्याच दिवशी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी ते लाहोरलाही जाऊन आले आणि नंतर जातीय सलोख्याविषयीच्या गांधीजींच्या आवाहनाचा मसुदा घेऊन ते कराचीला गेले. जीनांनी भारतीय मुसलमानांनी कोणती भूमिका घ्यावी हे पाकिस्तानच्या हिताच्या दृष्टीने ठरवावे असे त्यांना सांगितले. त्यामुळे आपल्यावर जीनांचा विश्वास राहिलेला नाही, यामुळे आपण भारतीय मुसलमानांचे नेतृत्व करण्यात काहीच अर्थ नाही असे वाटून ते कायमचेच पाकिस्तानात राहिले. (पहा - 'Pathway to

भारतीय मुसलमान /१२५