पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिले आहेत असे आज दृश्य दिसते.
 जे नाकारण्याचा त्यांनी भावनात्कदृष्ट्या अट्टाहास केला ते सत्य फाळणीनंतर दारुणपणे त्यांच्यासमोर उभे ठाकले. हे सत्य नाकारण्याच्या प्रयत्नातच ओलीस धरण्याचा सिद्धांत मांडला गेला. त्याच्यावर प्रतियुक्तिवाद केला गेला की 'कुर्बानी' सिद्धांत सांगितला जाऊ लागला. आपण त्याच्यावर तर्कशुद्ध प्रतियुक्तिवाद केला तर मग मुस्लिम कदाचित आणखी एखादा नवा सिद्धांत मांडेलही. तो असे म्हणेल की फाळणीने झाली नाही त्याहून अधिक वाईट स्थिती मुसलमानांची अखंड भारतात झाली असती. आता ओलीस ठेवणे, कुर्बानी देणे. आणि अखंड भारताच्या वाईट पर्यायापेक्षा फाळणीचा कमी वाईट ठरणारा पर्याय स्वीकारणे इत्यादी सिद्धांताबरोबरच दुसरी भाषा आणि दुसरे सिद्धांत मांडतानाही आपल्याला मुस्लिम दिसतात. हिंदूंना राज्य करण्याचे माहीत नाही हा मुसलमानांचा एक आवडता सिद्धांत आहे. 'हँसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान' ही घोषणा याच संदर्भात दिली गेली आहे. मुसलमानांनी एक हजार वर्षे राज्य केले आहे राज्य कसे करावे हे त्यांनाच कळते असे ते नेहमी सांगतात. यात सुमारे सात-आठशे वर्षे भारतात मुस्लिम राज्य होते. एवढेच ऐतिहासिक सत्य आहे. इतिहासाकडे विकृतीने पाहण्याचा जो मुस्लिम मूर्खपणा ह्या विधानातून व्यक्त होतो त्यावर येथे भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. हे दोन परस्परविरोधी सिद्धांत एकाच वेळी मुसलमान मांडताना दिसतात. मुसलमान हिंदूंपेक्षा शूर आहेत किंवा लढून हिंदुस्थान मिळवणार आहेत असे जर मानायचे तर मग त्यांनी हिंदू वर्चस्वाच्या भीतीने पाकिस्तान का मागितले? किंवा अखंड भारतात त्यांची परिस्थिती वाईट असती असे ते का मानत होते? असे प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात उभे राहतात. मुसलमानांना ही विसगंती अजूनदेखील जाणवलेली मला कधी दिसलेली नाही. आपण त्याच्याशी तर्काने युक्तिवाद करायला गेलो तर आपल्या - पदरी निराशा पडेल. तर्कशुद्धता हा गुण मुस्लिम समाजाने अजून स्वीकारलेला नाही आणि तर्काला धरून बोलणारा सुशिक्षित मुसलमान मी अजून पाहिलेला नाही.

 त्याच्या या विसंगत परस्परविरोधी भूमिका त्याच्या मनाच्या ठेवणीकडे मानसशास्त्रदृष्ट्या पाहिल्यासच समजून येतात. एकीकडे त्याला धर्मश्रेष्ठत्वाचा अहंकार डिवचत असतो. हे ‘श्रेष्ठत्व केवळ आपला धर्म श्रेष्ठ आहे इतक्या पारमार्थिक मर्यादित अर्थाने त्याने मनाशी. बाळगलेले नाही. इस्लाम धर्म श्रेष्ठ आहे याचा त्याचा अर्थ 'बिगर मुस्लिम व्यक्तीच्या तुलनेने वैयक्तिक मुसलमान आणि बिगर मुस्लिम समाजाच्या तुलनेने मुस्लिम समाज श्रेष्ठ आहे' असा होतो. परंतु हे त्याने आपल्या तर्कदुष्ट कल्पनेने निर्माण केलेले स्वतःचे एक विश्व असते. वस्तुस्थिती त्याने निर्माण केलेल्या विश्वाच्या अगदी विरुद्ध आहे हेही त्याला जाणवत असते. त्याचा हा मनाचा गोंधळ त्याच्या या परस्परविरोधी श्रद्धांतून मग प्रकट होत असतो आणि म्हणून स्वत:चा अहंकार गोंजारण्यासाठी आणि आपल्या कल्पनेतील विश्वावरच्या श्रद्धा व्यक्त करण्यासाठी तो मुस्लिम श्रेष्ठत्वाच्या बढाया मारीत असतो. आपल्या दुर्बलतेची जाणीव लपविण्यासाठीही त्याला याचा उपयोग होतो. हे तो आपले समाधान करण्यासाठी बोलत असतो आणि प्रत्यक्षात या बकवासाचा काही उपयोग होण्यासारखा नाही हे माहीत असूनही व्यवहारातले प्रश्न सोडविण्यासाठी तो दुसरी विसंगत भूमिका घेताना आढळतो.

१२४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान